पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सुधारणावादी युगाने माणसाचा घरगुती जगण्याचा पैस विस्तारला. जे शिकले ते घरास मुकले. अडाणी माणूस तेवढा शहाणा ठरला. शिक्षण मुळात सुरू झाले तेव्हा ती ज्ञानसाधना होती. माणसास जगण्याची भ्रांत नव्हती. जल, जमीन, जंगल त्याच्या उशाशी होते. हे तीनही ज्याला आपसूक मिळते तो निसर्गसंपन्न जीवन जगत असल्याने तो निश्चीत राहतो व दीर्घजीवी जीवनाचे वरदान त्याला लाभते. मला रवींद्रनाथ टागोरांचे घराणे खुणावते. ते गर्भश्रीमंत होते. नेहरू घराण्याप्रमाणेच; पण त्यांनी निसर्गाशी नाते जोडून ठेवले. ते सर्व भाऊ साहित्य, कला, सांस्कृतीत रमले व विश्वभारतीचे स्वप्न ते जगास देऊ शकले. ज्या घराण्यांनी युरोपची वाट धरली, ती भौतिक संपन्न झाले; पण क्रौंचवधाचा शाप त्यांना मिळाला. इकडे महाराष्ट्रात आपण पाहतो की महात्मा फुले नि सावित्रीबाई फुले यांनी यशवंताला दत्तक घेत जगाचे दु:ख कवटाळले. ते आजही समाजाच्या लेखी वंदनीय, अनुकरणीय राहतात.
 जगण्याचे माणसाचे तत्त्वज्ञानही सर्जनात्मक असावे लागते. अफूची बोंडे उगवली की ती फोफावायला वेळ नाही लागत. माणसांनी ठरवायचं असतं की परस, अंगणात काय लावायचं, काय पेरायचं. पेराचं स्वत:चं असे एक चक्र आहेच. ते पावसाच्या चक्रासारखे अटळ असते. अंगणी तुळस पेराल तर प्राणवायू मिळणार, अफू पेराल तर लादेनचे मरण अटळ! म्हणून पेरा तुम्हाला आत्मसात करता आला पाहिजे. सर्जनात्मक मानवतावाद तुम्हास नित्य नव्या विधायक जगाकडे घेऊन जातो. विध्वंसाचे सुरुंग पेराल तर तुम्हीच ज्वालामुखीवर बसलेले, वसलेले रहाता. कोळशाची खाण असते तिथे हिरे असतात, तसे कोळसेही! हिरे काढण्यापुरती कोळशाची खाण उकरता तोवर संयमित उपभोगाची काटकसर तुम्हास दीर्घजीवी जीवनाचा वरदहस्त देत रहाते. पण पृथ्वीच्या पोटाचाच तुम्ही कोतळा उपसू मागाल तर मात्र तुम्ही पोकळ पाताळावरच्या जगण्याच्या अशाश्वत चिंता नि चिंतनातच जगणार! माणसानी जीवनशैली ठरवायची. ‘सुशेगात जगायचे की ‘ससेमरण'. महात्मा होण्याचा कैफच असतो नि मिडास होण्याचापण कैफ ही जाणीवपूर्वक स्वीकृती असते.व्यसन अनवधान असते.

 निश्चलनीकरण हा कृष्णव्यवहाराचा रामबाण उपाय होऊ शकत नाही. फकिरीकरण कवटाळायचे डोहाळे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानी संस्कृतीत फलद्रूप होऊ शकत नाही. त्यासाठीची नि:संगता जन्मायची तर निसर्गाच्या सौंदर्याचं, सहजतेचं तुम्हास आकर्षण हवं! मला हिमालयात फिरताना घनदाट जंगलात सर्व ऋतूंना पराजित करत जगणारा एक योगी भेटला. मी त्याला विचारले

सामाजिक विकासवेध/१५६