Jump to content

पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांचा छोटूरामांना प्रचंड पाठिंबा होता. त्यांनी विधिमंडळामध्ये बील मांडले होते की, 'शेती उत्तम पिकत असूनही शेतकरी कर्जात बुडतो आहे. त्यामुळे सावकार जप्ती आणून त्यांच्या जमिनी काढून घेत आहेत. सरकारने कायद्याने सावकारांना अशा तऱ्हेने जमिनीवर जप्ती आणण्यास बंदी करावी.' त्यावेळच्या काँग्रेसने या बिलाला प्रचंड विरोध केला. युक्तिवाद असा केला, की 'सावकारांनी जमिनी जप्त केल्या नाहीत तर त्यांना धंदा बंद करावा लागेल. मग शेतकऱ्यांना कर्ज कोण देणार?' सर छोटूराम १९४६ मध्ये वारले; पण जमीनदार युनियन ही संघटना इतकी ताकदवाद होती, की १९४६ पर्यंत महंमद अली जीनांना या प्रांतात पाऊलसुद्धा ठेवता आलं नाही.

 देशातला स्वातंत्र्याचा प्रश्न असो की आर्थिक प्रश्न असो, तो खराखुरा शेतीच्या शोषणाचा प्रश्न आहे, आर्थिक विकासाचा प्रश्न आहे. हा हिंदू-मुसलमानांचा प्रश्न नाही; हा पोटामध्ये भूक असलेल्या असंख्य शेतकरी शेतमजुरांचा प्रश्न आहे. हे जर का त्यावेळच्या नेतृत्वाने मानलं असतं आणि तशी भूमिका घेतली असती तर ४७ मध्येसुद्धा फाळणी झाली नसती.फाळणी झाली त्याला कारण त्यावेळी घोषणा आणि भजनं जरी देशाच्या एकात्मतेची केली तरी अर्थवाद बाजूला ठेवून भाषा मात्र धर्माच्याच बोलल्या गेल्या.

 आज ते ४७ चे दिवस आठवण्याचे कारणही तसेच आहे. त्या वेळी मी शाळकरी विद्यार्थी होतो. आज रस्तोरस्ती अखंडतेच्या, एकात्मतेच्या घोषणा पाहिल्या, ऐकल्या, की पोटात गोळा उठतो. अशाच तऱ्हेची वाक्यं, घोषणा आम्हाला ४५, ४६, ४७ मध्ये ऐकू आल्या होत्या आणि ४७ मध्ये देशाचे तुकडे झाले.

 आज देशापुढे भयानक गंभीर समस्या आहे म्हणायचं आणि आम्हाला मतं द्या म्हणायचं, इतका हलकासलका काही हा प्रश्न नाही. राजकारणी पुढाऱ्यांना काय? देश बुडतो आहे, मग काय करा? आम्हाला मते द्या. बरं होत असलं तरी आम्हाला मतं द्या. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, की येत्या दोन वर्षांत देशाची काय भयानक अवस्था होणार आहे याची जाणीव सत्तेच्या मागे लागलेल्या या अधम पुढाऱ्यांना अजिबात नाही. देशाची पुढची परिस्थिती भयानक गंभीर आहे.

 पंजाबमध्ये एकीकडे अतिरेक्यांनी हैदोस घातला असताना गेली चार वर्षे शेतकरी संघटनेचे शांततापूर्ण आंदोलन चालू आहे. त्यात कुठे शीख, बिगरशीख असे वाद आड येत नाहीत. आज पंजाबमध्ये मी गेलो, की माझ्या सभेला लक्षावधी शीख शेतकरी जमतात. दुसरा कुणीही गेला तर हे होत नाही. हे मी अभिमान म्हणून सांगत नाही; पण परिस्थितीचा बरोबर अभ्यास केल्याने मला हा अनुभव येतो हे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १७५