पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पले भविष्य जाणण्याची उत्सुकता हा मानवी मनाचा फार प्राचीन काळापासूनचा धर्म आहे. या उत्सुकतेबरोबरच ती पुरविण्याची, तृप्त करण्याची सिद्धता म्हणजेच भविष्य सांगण्याचे सामर्थ्य हेही फार प्राचीन काळापासून मानवाने प्राप्त करून घेतले आहे, असे जगातल्या सर्व देशांच्या प्राचीन इतिहासावरून दिसते. भविष्यज्ञान असणाऱ्या लोकांचे त्या काळी दोन वर्ग असत. रवि, बुध, शनि, मंगळ, गुरू, इ. आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास करून त्यावरून भविष्य वर्तविणारे फलज्योतिषशास्त्रज्ञ हा एक आणि दुसरा म्हणजे अंतर्ज्ञानी, त्रिकालज्ञानी साधुपुरुषांचा. यांना शनिमंगळांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नव्हती. परमेश्वरी कृपेने त्यांना काही दैवी सामर्थ्य प्राप्त होत असे. आणि त्यामुळे भूतभविष्यवर्तमान या सर्वांचे त्यांना ज्ञान सहज होत असे. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत भविष्यकाल जाणण्याचे व भविष्य वर्तविण्याचे सामर्थ्य असणारे हे दोनच वर्ग असत. मार्क्सवादाच्या उदयाबरोबर या सामर्थ्याने संपन्न असा तिसरा वर्ग जगात दिसू लागला. मात्र तोपर्यंतचे वर सांगितलेले जे दोन वर्ग त्यांना हे सामर्थ्य असते हे मार्क्सवादाला मान्य नाही. जगातील घडामोडींचे शास्त्रीय ज्ञान फक्त आपल्यालाच आहे, आपल्याच पद्धतीने फक्त ते मिळू शकते, म्हणून भविष्य सांगण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे असा या वर्गाचा दावा आहे. फलज्योतिषी किंवा अंतर्ज्ञानी हे मार्क्सच्या मते भोंदू, ढोंगी, समाजाला फसवून त्याला लुबाडणारे किंवा निदानपक्षी अज्ञ, भोळसट व अंध असे लोक आहेत. आपण मात्र पूर्ण तर्कनिष्ठ, शास्त्रपूत, बुद्धिवादी व सत्यनिष्ठ आहो असे मार्क्सवाद्यांचे मत आहे.