पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'हिंदूंना बोलावल्यामुळे ते भारतात गेले' असे म्हणणाऱ्या जीनांच्या इस्लामिक न्यायाची कल्पना त्यांच्या या मंत्र्याने अजून पुरेशी अंगी बाणविली नव्हती.
 १३ जुलै १९४७ ला पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत दोन्ही देशांतल्या अल्पसंख्यांकांनी त्या त्या देशांशी एकनिष्ठ असले पाहिजे असेही जीनांनी म्हटले होते. परंतु भारतीय मुसलमानांनी भारताशी एकनिष्ठ राहावे असे जीनांना खरोखर वाटत होते का? चौधरी खलिकतझमान यांच्या पुस्तकात वेगळीच माहिती पुरविलेली आहे. ती त्यांच्याच शब्दांत देणे अधिक उपयुक्त ठरेल. ते आणि सुहावर्दी जेव्हा शांततेच्या आवाहनाचा मसुदा होऊन कराचीला जीनांना भेटायला गेले तेव्हा जीनांनी तीन दिवस त्यांना भेटच दिली नाही आणि जेव्हा भेट दिली तेव्हा, “भारतात मुसलमानांचे निर्वंशीकरण होत आहे" या पाकिस्तानचे तेव्हाच परराष्ट्रमंत्री जाफरूल्लाखान यांच्या संयुक्त राष्ट्रातील आरोपाला उत्तर देणारे जे निवेदन विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून चौधरी खलिकुत्झमान यांनी केले होते त्याची प्रत जीनांनी त्यांच्यासमोर ठेवून विचारले, "हे निवेदन तुम्ही कसे दिलेत? दोन्ही देशांत दंगली झाल्या आहेत, या तुमच्या निवेदनाने आम्हाला दुःख झाले आहे." खलिकुत्झमान म्हणतात.... “मी भारतीय मुसलमानांचा नेता होतो. जाफरूल्लाखानांच्या निवेदनाला भारतीय मुस्लिम नेता म्हणून उत्तर देणे माझे कर्तव्य होते, हे जीनांनी समजून घेतले नाही." ते पुढे म्हणतात.... “जीनांच्या हेही निदर्शनाला आणले की लियाकत अली खान दिल्लीला नेहरूंबरोबर बोलणी करायला गेले आहेत आणि युद्ध करणे कोणालाच पसंत पडणार नाही असे दोन्ही पंतप्रधानांनी म्हटले आहे. मीही दोन्ही देशांत चुका झाल्या आहेत एवढेच म्हटले आहे. शिवाय मी एक भारतीय मुसलमान म्हणून घेतलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानचे हित कसे काय धोक्यात येते? परंतु जीनांना मी ही भूमिका पटवू शकलो नाही." जीनांनी केवळ त्यांची भूमिकाच समजून घेतली नाही इतकेच नव्हे, तर त्यांना पुन्हा भारतात येऊही दिले नाही. जितक्या सहजपणे मनुष्य झोपेत कूस बदलतो तितक्या सहजपणे चौधरीसाहेबही भारतीय मुस्लिम लीगऐवजी पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेतृत्व करू लागले.

 जीनांची भूमिका चौधरी खलिकुत्झमानना का समजू शकली नाही याचे आश्चर्य वाटते. लियाकतअली खानांनी त्यावेळी नेहरूंशी चालविलेल्या वाटाघाटींचा ते उल्लेख करतात. लियाकत-नेहरू वाटाघाटी आणि शांततेची आवाहने हा जीनांच्या राजकारणातील डावपेचाचा एक भाग होता. ते ज्या घोषणा जाहीरपणे करीत त्या त्यांच्या अंतिम उद्दिष्टांची साधने असत. जीनांच्या राजकारणाची अंतिम उद्दिष्टे चौधरी-खलिकुत्झमानना वाटतात तेवढी साळसूद नव्हती. भारतीय मुसलमानांनी भारताशी एकनिष्ठ असावे असे जाहीरपणे सांगणारे जीना भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताचा विचार करावा ही त्यांना खासगी शिकवण देत होते. चौधरी - खलिकुत्झमाननी वरवर भारतावर निष्ठा जाहीर करून पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली नाही, हे जीनांचे त्यांच्यावरील रागाचे कारण होते. जीनांना संघर्ष टाळावयाचे होते, दोन्ही देशांत अल्पसंख्यांकांबाबत विश्वास निर्माण व्हावा असे त्यांना वाटत होते, तर पाकिस्तानातील दंगलींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून भारतातच दंगली होत आहेत अशी प्रचारकी असत्य भूमिका त्यांनी घेतलीच नसती. त्यांना भारतीय

९२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान