Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१७
पेशवाईचा उदय
 


सनदा
 कराराप्रमाणे खंडेराव दाभाडे याच्या हाताखाली मराठ्यांची फौज औरंगाबादेस आली. याच वेळी दिल्लीचा सय्यद हसन अली अबदुल्ला याचे व बादशहाचे सडकून वाकडे आले, म्हणून त्याने हसन अलीला दिल्लीला बोलाविले. तेव्हा तो मराठ्यांची फौज बरोबर घेऊन निघाला. बादशहाला अर्थातच हे रुचले नाही. त्याने मराठ्यांशी झालेला तह नामंजूर केला आणि आपल्या वगीच्या सरदारांना सेना घेऊन दिल्लीस बोलविले.
 याचा अर्थ असा की दिल्लीला एका लढाईचीच तयारी चालू झाली आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. सय्यद बंधूंची स्वतःची तीस चाळीस हजार फौज होती. शिवाय मराठ्यांची दहाबारा हजार. यामुळे बादशहाच्यातर्फे कोणी सरदार ठाण मांडून उभा राहीना. सय्यद बंधू शहराची नाकेबंदी करून राजवाड्यात शिरले. तेथे कलह विकोपाला जाऊन त्यांनी फरुकसीयरला कैद केले व नव्या बादशहाची स्थापना केली. आणि मग त्याच्याकडुन मराठ्यांशी झालेल्या तहाला मंजुरी देवविली आणि ठरल्याप्रमाणे स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा बाळाजी विश्वनाथाच्या हवाली केल्या. २० मार्च १७१९ रोजी बाळाजी दिल्लीहून निघाला आणि जुलैमध्ये साताऱ्यात येऊन पोचला.
 वरील प्रकारच्या सनदांमुळे शाहूछत्रपतींचे आसन स्थिर झाले आणि त्यांच्या राजपदाला अवश्य ती प्रतिष्ठा प्राप्त झाली. चिटणीस लिखित शाहूचरित्राच्या आधारे सरदेसाई यांनी म्हटले आहे की अष्टप्रधान व सरदार त्यांचे हुकूम बिनतक्रार बजावून बाहेर संचार करू लागले. हुजुरांनी बोलाविले असता एका क्षणाचाही विलंब न करता येऊ लागले. सर्व निष्ठेने चालू लागले (पुण्यश्लोक शाहू, पृ. १३८). याचा अर्थ असा की शाहूपक्षाच्या मराठ्यांच्या मताने सुद्धा बादशाही सनदा मिळाल्यामुळेच शाहूराजे हे स्वराज्याचे खरे धनी झाले. मग दक्षिणेतल्या मुसलमान सुभेदार, सरदारांना तसे वाटले असल्यास नवल नाही. सनदांनंतरही निजामासारखे दक्षिणेचे सुभेदार आणि काही सरदार छत्रपतींना जुमानीत नव्हते हे खरे. अनेक मराठा सरदारांनी सुद्धा आपला विरोध सोडला नव्हता. हे सर्व खरे असले तरी शाहू छत्रपतींच्या सत्तेला या सनदांमुळे नैतिक प्रतिष्ठा लाभली, आणि स्वराज्यातील राज्यकारभार आणि दक्षिणच्या सहा मोगली सुभ्यांतील चौथाई- सरदेशमुखीचा वसूल पूर्वीपेक्षा जास्त सुकर झाला हे नाकारता येणार नाही.

नवा उद्योग
 दुसरा मोठा फायदा असा की मराठ्यांना बादशही हुकमानेच एक स्वतंत्र उद्योग मिळाला. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे मोगलांचे