Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




२. महाभारतातील समाजकारण

समाजकारण
 भारतीय तत्त्ववेत्त्यांचे धर्मकारण किती उज्ज्वल होते, राष्ट्रघटनेस व राष्ट्राच्या उत्कर्षास ते कसे पोषक होते आणि आज समाजात जे प्रबल विचारप्रवाह वाहात आहेत तेच त्या वेळी कसे वाहात होते ते मागे दाखविले. आता महाभारतातील समाजकारणाच्या सिद्धांताचा विचार करावयाचा आहे. तो विचार आपण केला म्हणजे असे दिसून येईल की, भारतीयांनी समाजरचनेसंबंधी सांगितलेले सिद्धांतही राष्ट्रहिताच्या दृष्टीने पुष्कळ प्रगतिकर व पथ्यकर असेच होते. धर्मकारणातील त्यांचे सिद्धांत आज अगदी तंतोतंत आपण अनुसरण्यास हरकत नाही असे सांगितले. या समाजकारणातील विचार तितक्याच पूर्णतेने अनुसरावे असे म्हणता येईल असे वाटत नाही. पण असे मात्र निश्चित म्हणता येते की, ती रचना जशीच्या तशी राहिली तर आज आलेली दुर्गती मुळीच प्राप्त झाली नसती. किंबहुना त्यातील विचारांचा प्रभाव कमी झाला नसता व त्याच धोरणाने समाज प्रगत झाला असता तर आज आपण इष्ट अशा स्थितीला कदाचित येऊन पोचलोही असतो.