Jump to content

पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करताना मला एक हिंदी वाचक, अभ्यासक, संशोधक, लेखक, अनुवादक, शिक्षक, प्राध्यापक, संपादक म्हणून आनंद होत आहे.
 कोणत्याही प्रांत वा पंचक्रोशीचा विकास भाषेनं होत असतो. ज्या मनुष्य, समुदायांनी अनेकानेक भाषा आत्मसात केल्या त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून अटकेपार झेंडा लावला.
 एकभाषी समाज संकुचित राहतो. माणसाचंही तसंच असतं. बहुभाषी मनुष्यच बहुश्रुत होतो. आजचं जग हे विश्वसमुदाय बनत आहे. तुम्हास नुसतं भारतीय भाषा येऊन चालणार नाही तर जर्मन, जपानी, चिनीही यायला हवी. इंग्रजी सर्वांना येऊ लागली आहे. माध्यमांमुळे हिंदी भारताची बोलिभाषा झाली आहे.
 हिंदी आपल्या देशाची संपर्कभाषा आहे. ती राजभाषा (कार्यालयीन सरकारी भाषा) ही आहे. ती राष्ट्रभाषा बनविण्याचे लक्ष्य आपणासमोर आहे नि असले पाहिजे. देशाला राष्ट्रभाषा असणे हा केवळ अस्मितेचा प्रश्न नसून अस्तित्वाचाही प्रश्न आहे. विदेशात हिंदी भारतीय भाषा म्हणून ओळखली जाते. जगातील १२५ विद्यापीठांतून ती शिकविली जाते. जगातील तिसरी भाषा होण्याचा गौरव असलेली हिंदी आपली राष्ट्रभाषा होऊ नये यासारखी शरमेची बाब नाही. भाषा राष्ट्रभाषा व्हायची तर त्या भाषेत विपुल दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं निघायला हवीत. 'लोकमत समाचार'ही त्याची सुरुवात आहे. लोकमत समूहाने ‘सहारा समय’ सारखं 'लोकमत समय' किंवा 'लोकमत साप्ताहिकी' सुरू करायला हवं. कोल्हापूरच्या पंचक्रोशीत हिंदीभाषी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, हिंदी अधिकारी, हिंदी भाषी इतके आहेत की त्यांना रोजचं जग हिंदीतून समजून घेणं, वाचणं म्हणजेच आपला देश देशी भाषेतून समजून घेऊन देशविकासातील आपली एतद्देशीय भागीदारी वाटते. 'लोकमत समाचार' सुरू झाल्यानं महात्मा गांधींचं एक स्वप्न पूर्ण झालं. महात्मा गांधी म्हणत, 'देश को देश की भाषा में पढना, लिखना, बोलना चाहिए।'

***

जाणिवांची आरास/८२