पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्ष-किरणें । ६३

सर्वस्वत्यागास सिद्ध झाले पाहिजे असा निश्चय करणाऱ्या तरुणांची पिढी त्यांनी निर्माण केली. आणि या त्यांच्या संदेशामुळेच या भूमींत सर्वत्र चैतन्य रसरसून येऊन लोकांच्या सर्वांगीण कर्तृत्वाला फुलोरा आला हें ऐतिहासिक सत्य आहे. त्यांच्या कार्याचें मूल्यमापन करतांना हे सत्य दृष्टीआड करण्याची सध्या चाल पडत आहे, पण तें दृष्टीआड केलें तर आपल्या देशाला लाभलेलें स्वातंत्र्यच आपल्याला दृष्टीआड करावें लागेल, हें आपण विसरता कामा नये.
 तेव्हा स्वातंत्र्याची प्रेरणा हें त्यांचें मुख्य जीवितकार्य हें नित्य ध्यानी वागवून त्या संदेशाने प्रेरित झालेल्या तरुण वीरांनी रणांगणांत उतरतांना स्वतःच्या शारीर व मानसिक प्रकृतीच्या दृष्टीने कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी त्यांनी जे उद्बोधक विचार सांगितले त्यांचे स्वरूप आता स्पष्ट करू.
यज्ञोपवीत
 'देशोन्नति' हा त्यांचा निबंध पाहा. मृत्यूच्या आधी थोडेच दिवस हा निबंध त्यांनी लिहिलेला आहे. देशाभिमानाचा अभाव ही जी भारताची सर्वांत मोठी व्याधी तिच्यावरच त्यांनी येथे नेमके बोट ठेविलें आहे. ते म्हणतात की, "इकडील देशांतून देशाभिमान ही मनोवृत्तीच म्हणण्यासारखी लोकांस माहीत नाही. रोम, ग्रीस, इंग्लंड, अमेरिका वगैरे ठिकाणीं स्वदेशप्रीति म्हणून एक अत्यंत प्रबळ मनोवृत्ति आजला जशी आढळत आहे तशी एशिया खंडांतील कोणत्याहि देशांत आढळत नाही" असें व्यापक विधान करून १८५७ साली झालेल्या संग्रामाविषयी ते म्हणतात की. "त्यांस कारण देशाभिमान बिलकुल नसून केवळ धर्माभिमान होय. इतकी काळी फौज जी एकाएकी बिथरली, तिच्यापैकी एकाहि शिपायाच्या अंगीं ह्यामडन् किंवा वॉशिंग्टन यांच्या अंगांतला आवेश (देशाभिमान) संचारला असेल असें बिलकुल म्हणवत नाही." हाच विचार आणखी स्पष्ट करण्यासाठी त्या वेळी उपस्थित झालेल्या बर्वे- प्रकरणाविषयी त्या वेळच्या शिष्ट लोकांचे उद्गार त्यांनी दिले आहेत. ते म्हणत असत की, "या लष्कराच्या भाकरी भाजल्यावांचून यांचें काय अडलें होतें ? हीं राजकीय प्रकरणे, यांत आपल्यासारख्या गरीब पत्रकर्त्यांनी कशाला पडावें ? हरि हरि म्हणत स्वस्थ बसावयाचें सोडून, या मंडळींनी हा काय नसता उपद्व्याप आरंभिला आहे ?" त्या वेळचा समाज सार्वजनिक जीवनाला किती विमुख होता, देशसेवेच्या जाणिवेचा लवलेशहि लोकांच्या ठायीं कसा नव्हता, हें दाखविण्यासाठीच शास्त्रीबुवांनी हे उद्गार नमूद केलेले आहेत. १८९७ सालों लो. टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होण्याचा संभव दिसला त्या वेळी कांही लोकांनी त्यांना, "या लष्कराच्या भाकरी आपण भाजूं नये," असाच सल्ला दिला होता. विष्णुशास्त्री म्हणतात, "वरच्यासारखें पोक्त तत्त्वज्ञान आमच्या वाचकांपैकी शेकडो किंवा हजारो जणांनी ऐकलें असेल. तर हीच स्थिति आजपर्यंत आमच्या देशांत चालत आली आहे. लोकांस अभिमानास चढायास