Jump to content

पान:आमची संस्कृती.pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १४९

बाबतींत एक क्षणाची गोष्ट आहे; स्त्रियांच्या बाबतीत त्याचे पर्यवसान गर्भधारणा व मातृत्व ह्यांत होऊन त्यामुळे शरीरावर व मनावर चिरकालीन परिणाम होतो. मातृपद प्राप्त झालेली स्त्रीच शारीरिकष्ट्या व म्हणून मानसिकष्ट्याही संपूर्ण स्त्री म्हणता येईल. अशा स्त्रीच्या कर्तृत्वशक्तीला पूर्ण वाव मिळण्यासाठी काय करावे?
 शहरांतील मुली सोडल्यास बाकी मुलींचे लग्न चौदा वर्षेपर्यंत व्हावयाचे राहत नाही. ह्या मुली चौदा वर्षांत सर्व गृहकृत्ये, शेतावरील कामे, गुरावासरांची जोपासना, गायीम्हशींच्या धारा काढणे वगैरे शिकतात. घरी अत्यंत गरिबी नसेल तर भरपूर काम व पोटभर भाकरी मिळून शरीर जोमदार व कणखर होते. ह्या मुलींची स्थिती पांढरपेशा मुलींच्यापेक्षा पुष्कळच निराळी असते. लग्न झाले की माहेराला मेली' अशी त्यांची स्थिती नसते. माहेरची माणसे मुलीची चांगली वास्तपुस्त करतात. दोन-तीन मुले होईपर्यंत सासरी असे कायमचे राहणे नसते. काहीतरी निमित्ताने माहेरी जावयाचे व परत सासरी जायला खळखळ करावयाची असे नेहमी चाललेले असते. सासरच्या माणसांनी भेट आणायची, बोलावणी करावयाची, शेवटी दुसरे लग्न करीन म्हणून धाक घालावयाचा, तेव्हा कोठे गृहलक्ष्मी घरात यावयाची! बहुतेक बायकांना शिवणे-टिपणे फारसे माहीत नसते; काही घरांतून नव-यालाच कारभारणीची चोळी शिवताना मी पाहिले आहे. नवरा-बायको बरेचदा आते-मामे भावंडे असल्यामुळे मुलगी अगदीच परक्या घरी जात नाही. त्याचप्रमाणे हुंडा मुलाला द्यावा लागत असल्यामुळे वधूपक्षाचे नाक नेहमी वर असते. पांढरपेशांतल्यासारखा लाचार व दुबळा वधूपक्ष मराठ्यांत दिसून येत नाही. घरांतली कामे संभाळून ह्या बायका शेतावर किंवा मळ्यावर काम करतात. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात बाजारहाटही बायकाच करतात. नव-याने टाकून दिले तर त्यांना दुस-या लग्नाची पंचाईत पडत नाही किंवा नव-याने सवत आणली तरी त्यांना मोठीशी खंत नसते. त्या बायका पांढरपेशांच्या बायकाइतक्या दीनवाण्या नसतात, पण त्यांचे आयुष्य फार कष्टाचे असते. वारंवार होणारी बाळंतपणे व रोजचे कष्ट यामुळे त्या लौकर म्हाताच्या दिसू लागतात. कामाचा बोजा पुरुषांच्या बरोबरीने उचलूनसुद्धा त्या आपल्या गावच्या सार्वजनिक आयुष्यात भाग