करुणादेवी/सासूसासऱ्यांची समाधी

विकिस्रोत कडून

सा सू सा स ऱ्यां ची
स मा धी

♣ * * * * * * ♣







 दुष्काळ संपला होता. देवाला करुणा आली. आकाश भरभरून आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली.

 राजा यशोधराने दुसच्या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बियाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. गायीगुरे चरू लागली. परागंदा पाखरे पुन्हा येऊ लागली. गाऊ लागली. शेतकरी शेतात दिसू लागले. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.

 सुबत्ता आली. धान्य पिकले. करुणा सासूसासऱ्यास आता पोटभर जेवण वाढी. त्यांचे पाय चेपी. तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या. एक मामंजीच्या खाली तिने घातली. एक सासूबाईंच्या. ती म्हाताऱ्यांची दाई बनली, आई बनली.

 परंतु ती पिकली पाने आता गळणार असे दिसू लागले. सासूबाई एके दिवशी आंग धुऊन येत होत्या. तो त्या धपकन् पडल्या. करुणा त्या वेळेस घरात नव्हती. सासऱ्यानेच उठून सावित्रीबाईस घरात आणले, परंतु सावित्रीबाईस शुद्ध येईना.

 दुपारी करुणा घरी आली, तो हा प्रकार. ती धावत प्रेमानंदाकडे गेली. प्रेमानंद कसली तरी मुळी घेऊन आला. एक मात्रा घेऊन आला. परंतु कशाचा उपयोग नव्हता. सासूबाई देवाघरी निघून गेल्या होत्या.

 आता वृद्ध सुखदेव राहिले. तेही जणू आपली वाट पाहात होते.  “ ती गेली. आता मलाही बोलावणे येईल. करुणे, तू जा. तुला देव आहे. शिरीष तुला भेटेल. निराश नको होऊ. मरणोन्मुख माणसाचा मनापासून दिलेला आशीर्वाद खोटा नाही होणार.” ते करुणेला म्हणत.

 एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले. जरा छातीत कळ आली आणि स्रारे खलास.

 सासूसासरे, दोघे गेली. करुणा एकटी राहिली. ती कर्तव्यातून मुक्त झाली होती. जी शपथ तिने घेतली होती, ती तिने अक्षरशः पाळली होती. परंतु अद्याप एक कर्तव्य राहिले होते. शेवटचे कर्तव्य.

 त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधण्याची प्रथा होती. राजे-महाराजे प्रचंड समाध्या बांधीत. गोरगरीब चार दगड तरी उभारीत. जेथे मृतांना जाळले, पुरले, त्या जागेवर पाय पडू नयेत म्हणून ही व्यवस्था ! गावोगाव अशा लहानमोठ्या समाध्या दिसत असत. चबुतरे दिसत असत. कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या.

 परंतु करुणा कशा बांधणार समाध्या? ती गरीब होती. राहाते घरही गहाण होते. कोठून मिळणार कर्ज ? मोलमजुरीतून कितीसे उरणार? ते किती पुरणार? अश्रूची बांधता आली असती, तर अमर समाधी तिने बांधली असती. मोत्यांसारखे अश्रू. परंतु त्यांची कशी बांधणार समाधी? अश्रूची आरसपानी समाधी हृदयांगणात बांधता येईल. परंतु जगाच्या आंगणात दगडाधोंड्यांचीच समाधी हवी.

 करुणेने निश्वय केला. दगडाधोंड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला. दिवसभर ती पोटासाठी काम करी. परंतु रात्री ती मोकळी असे. ती रात्री उठे, जंगलातून, रानातून हिंडे, सुरेख दगड गोळा करीत हिंडे. गुळगुळीत चपटे दगड. तिला भीती वाटत नसे. अस्वलालांडग्याची, तरसावाघाची तिला भीती वाटत नसे. भुताखेताची, खवीससमंधाची तिला भीती वाटत नसे.

 एखादा सुरेखसा दगड सापडला, की तिला आनंद होई. कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगड वेचीत हिंडे. थकून भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे. चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी. वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत. आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूंचे पाणी लावून तिला उठवी. पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई.

 दगड बरेच जमा झाले. दोन लहानसे चबुतरे आता बांधता येतील, असे करुणेला वाटले. तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला. तिने माती तुडविली. मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता. गारा पक्का होऊ दे.

 आज रात्री समाधी बांधण्याचा आरंभ ती करणार होती. दोन्ही समाधींचा एकदम आरंभ. ती एक दगड सासऱ्याच्या समाधीसाठी लावी. दुसरा सासूच्या. दोन्ही समाध्या एकदम पुऱ्या झाल्या पाहिजेत. तोंडाने गाणे म्हणत होती. तन्मय झाली होती.

 एका रात्रीत ते काम थोडेच पुरे होणार ! दोन तीन रात्री गेल्या. अद्याप समाध्या अपुऱ्या होत्या. दगड कमी पडणार वाटते ?

 त्या रात्री करुणा सारखे ते बांधकाम करीत होती. दगड संपले. आज काम पुरे करायचेच, असे तिने ठरविले होते. ती दगड धुंडीत निघाली. सापडला की आणीत होती. परंतु थकली. त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी घेऊन पडली ! कर्तव्यपरायण करुणा !

 ती गाढ झोपेत होती, की बेशुद्ध अवस्थेत होती ! बेशुद्ध नाही. झोप आहे. श्वास चालला आहे. झोप हो, करुणे ! भूमातेच्या मांडीवर जरा झोप. धरित्रीआई तुझे काम पुरे करील. ती धावून येईल.

 आणि खरेच धरित्रीमाता आली. मुलीच्या मदतीला आली. सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्रीमाता आली. करुणेच्या स्वप्नात धरित्रीमाता आली व म्हणाली, “ मुली, थकलीस हो तू. धन्य आहेस तू. तुझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही. किती आजपर्यंत श्रमलीस, कष्टलीस. झोप हो तू, तुझ्या समाध्या मी पुऱ्या करविते. मी नागोबा व वाघोबा ह्यांना सांगते, की जा रे त्या समाध्या नीट बांधा. सुंदर बांधा. करुणे, तु सकाळी उठशील तो समाध्या बांधलेल्या असतील. चिंता नको करू. झोप जरा. माझ्या मांडीवर झोप.”  आणि खरेच नागोबा व वाघोबा आले. त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले. वाघाने दगडांवर आंग घासून घासून ते आरशासारखे गुळगुळीत केले. नागोबा लांब होई, मोज माप करी, अंगाचा गुण्या करी.

 “ नागोबा, कशा आकाराच्या बांधाव्या रे ?”

 “ वाघोबा, कमळाकृती बांधाव्या. अष्टपत्री बांधाव्या. जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे.”

 मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले. त्या समाधींची वृक्षवेलींनी पूजा केली. वाऱ्याने स्तुतिस्तोत्रे म्हटली. त्या समाधींची निसर्गाने पहिली पूजा केली.

 उजाडले. दिशा फाकल्या. सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली. जणू प्रेमळ पित्याने जागे केले. करुणा उठली. जणू स्वप्नसृष्टीतून उठली. तिचे हृदय आनंदाने, सुखाने भरून आले होते. जणू ती माहेरून आली होती. आईचा हात अंगावर फिरून आली होती.

 ती समोर पाहू लागली, तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या ! आजूबाजूस इवलीही घाण नाही. दगडधोंडा उरलेला नाही. मातीचा गारा पडलेला नाही. सारे स्वच्छ व सुंदर, ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहात होती. खरेच का भूमातेने ह्या पुऱ्या केल्या ? तिने त्या समाधींस हात लाविला. तो त्या खऱ्या होत्या. स्वप्न नाही. भ्रम नाही.

 तिने त्या समाधीस प्रदक्षिणा घातल्या, आणखी रानफुले घेऊन आली. पिवळी, निळी, पांढरी फुले. वेलींच्या दोरात ती फुले गुंफून तिने माळा केल्या. त्या समाधीवर तिने त्या रमणीय माळा घातल्या. तिने भक्तिमय प्रणाम केला, आणि ती निघाली.

तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते. कोणाला सांगू हा आनंद ? कोणाला दाखवू? हा आनंद मी एकटी कशी भोगू? शिरीष, कोठे रे आहेस तू? ये, ये. तुझा हात धरून तुला तिकडे नेते. परंतु शिरीष लांब लांब शेकडो कोस दूर होता.

 परंतु शिरीषचा मित्र आहे. प्रेमानंद आहे. करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली. दु:खी कष्टी करुणा आज इतकी आनंदी का ते लोकांस कळेना. खी-पुरुष तिच्याकडे पाहात होते.  “ प्रेमानंद, ” करुणेने हाका मारल्या.

 “ काय करुणे ?”

 “ प्रेमानंद, आनंदाची वार्ता. मी त्या दोन समाध्या बांधीत होते ना. त्या अकस्मात रात्री पुऱ्या झाल्या. मला रात्री तेथे झोप लागली. स्वप्नात भूमाता आली व म्हणाली ‘रडू नको, नीज. माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील.' प्रेमानंद, खरेच त्या पुऱ्या झाल्या आहेत. सुंदर समाध्या. येता बघायला ? चला."

 प्रेमानंद निघाला. गावात सर्वत्र ही बातमी गेली. सारा गाव निघाला, स्त्री-पुरुष, लहान-थोर सर्व निघाले. जणू यात्राच,होती. जणू मोठा उत्सवच होता. सर्व मंडळी त्या ठिकाणी आली. त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले. सर्वांनी त्या समाध्यांवर फुलं उधळली.

 “ धन्य आहे ही करुणा, " असे सारे म्हणाले. करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेला. करुणा एकटीच हळूहळू धरी आली. ती एकटी बसली होती. आया-बाया आल्या. तिच्याभोवती जमल्या. तिची स्तुती करू लागल्या. ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावर जगाची होते.

 करुणेला आता काही कमी पडत नसे. सावकाराने तिचे घर तिला दिले. मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला, कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत. कोणी अलंकार अर्पीत. कोणी बायका आपली मुले आणीत व तिच्या पायांवर घालीत. करुणा अंबरगावची जणू देवता बनली.

 परंतु देवता दुःखीच होती. देवतेचा देव कोठे होता ? शिरीष ! कोठे आहे शिरीष ? जुन्या बागेतील शिरीष वृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे, “फुलांना, सांगा रे शिरीष कोठे आहे तो. तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे. प्रेमळ व कोमल आहे. परंतु आज का तो दगडासारखा झाला, लोखंडासारखा झाला ? शिरीष, ने रे मला. भेट मला. तू मला म्हणाला होतास, की तुझे प्रेम मला खेचून आणील. का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणीत नाही ? माझे प्रेम कमी का पडते ? शिरीषाच्या फुलांनो,
तुम्ही मला प्रिय आहात. कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे. त्याने "हया केसात शिरीष फूलच जाताना खोवले होते.”

 एके दिवशी रात्री एकटीच करुणा त्या समाधींजवळ वसली होती.विचारात रंगली होती. तिने शेवटी त्या समाधींना प्रार्थना केली :

 "पवित्र आत्म्यांनो, प्रेमळ आत्म्यांनो ! मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल, कधी कंटाळल्ये नसेन, कर्तव्यात टंगळमंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटवा. शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की जा, करुणा रडत आहे. तिला जाऊन भेट. पवित्र आत्म्यांनो, ह्या मुलीची ही प्रार्थना पुरी करा.”

 समाधीना फुले वाहून ती घरी आली. ती अंथरुणावर पडली. शांत झोपली. जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल ह्या विश्वासाने ती झोपली होती. आज तिला लवकर जाग आली नाही. किती तरी दिवसात अशी शांत झोप तिला लागली नव्हती. आणि पहाटे पहाटे स्वप्न पडले. सासूसासरे शिरीषला हाताला धरून आणीत आहेत, असे तिने पाहिले. ती लाजली आणि स्वप्न भंगले. प्रेमात गलेले स्वप्न भंगले. परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात ?