पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : २२१


ब्राह्मण लोकांचा स्वभाव

पत्र नंबर ४८ : १८ फेब्रुवारी १८४९

 हिंदू लोकांमध्ये निर्लज्जपणा हे एक त्यांच्या दुःखास मोठे कारण आहे. पहा, एक जण लाच खातो व त्यांस सरकारातून शासन होऊन त्याची धिंड काढतात, हे पाहून लोकांस दहशत पडावी; परंतु ते काही नाही. जे त्याचे कामावर बसतात, ते लागलीच लाच खाऊ लागतात. तसेच इतर सर्व गोष्टींमध्ये दुर्गुणास लोक भीत नाहीत.
 याचे कारण असे की, या लोकांमध्ये छापखाने व वर्तमानपत्रे वगैरे फार नाहीत; याजमुळे त्यांस निर्लज्जपणाचे भय वाटत नाही. छापखान्यामध्ये जितके अधिक ग्रंथ छापतात, तितकी लोकांची सुधारणा होते; कारण कोणी काही अपराध केला तर तो छापला जातो आणि प्रसिद्धीस येतो, याजमुळे त्यांस असे भय प्राप्त होते की, माझी अपकीर्ती सर्व जगात होईल; आणि माझे स्नेही, मित्र परदेशात आहेत, त्यांसही कळेल. आणि माझे मागे ही लिहिलेली गोष्ट राहून अपकीर्ती मागे राहील. या भयाने लोक अपराध किंवा वाईट कामे करीत नाहीत आणि जरी अद्यापि ज्याची अपकीर्ती छापणारांनी लिहिली त्याने स्वतः मूर्खपणाने वाईट कामे सोडली नाहीत; तत्रापि त्याची फजिती होऊन त्याचे वंशातले पुढचे लोक आणि इतर लोक हे सावध होतात की, अमक्याने वाईट काम केले, त्याची अपकीर्ती जहाली. तेव्हा आपण केले तर तसेच होईल, त्यामुळे ते करीत नाहीत. एणेकरून छापखाना हे लोकांस मोठे बंधारण आहे. तसेच लोकही शहाणे होतात व त्यांस कोठे काय होते, हे कळते आणि सावध राहतात.
 जर छापखाना व डाक हिंदुस्थानात असती, तर परके लोक हिंदुस्थानात सुलभपणे आले, तसे आले नसते; परंतु या लोकांचे दुर्भाग्य, तेणेकरून छापखान्याचा फायदा त्यांस कळत नाही. जे ब्राह्मण प्राचीन समजुतीचे अद्यापि पुष्कळ आहेत, त्यांस असे वाटते की, छापखान्याचा काय उपयोग आहे ? बुकात पैका घालून काय फळ ? पृथ्वीवरच्या बातम्या ठेवून आम्हास काय करावयाचे आहे ? आपले घरातले पण पहावे. मोठ्या गोष्टी कशास पाहिजेत ? अशा ते रांडगोष्टी सांगतात.
 असे हे हिंदू लोक शिथिल आणि मूर्ख, म्हणून या दशेस आले. जर