Jump to content

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हगवण, नायटा हे रोगही घरोघर. बहुतेक सर्व आजार अशुद्ध पाणी, अपुरा आहार आणि जंतांमुळे होणारे.

 गावात शाळा एकच. चावडीवर भरणारी. शिक्षक हजर असला तर ती भरणार. गळके छप्पर, भेगाळलेल्या भिंती. तुटकी दारे. पावसाळ्यात खूपदा ती बंदच असे. एकूण मुलांचा शाळेत जाण्यापेक्षा न जाण्याकडे कल अधिक. 'शिकन काय करायचं?' ही आईवडलांची भूमिका. ते स्वतःही निरक्षरच. त्यामुळे एकूण अनास्था खूप. शेतावर काम असले तर मुले ते नाखुशीने का होईना पण थोडेफार करायची; नाहीतर दिवसभर अशीच उनाडक्या करत भटकायची.

 ह्या एकूण मागासलेपणाला कंटाळून अनेक तरुण मग शेती सोडून एमआयडीसीसारख्या जागी नोकरी शोधायला जात. असाच एक तरुण एकदा जोशींना भेटायला आला. म्हणाला,


 "साहेब, पूर्वी मी तुमच्या शेतावर मजुरी करायचो. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळल्यावर मला संध्याकाळी तीन रुपये भेटायचे. आज एका कारखान्यात लागलो आहे. मशिनच्या मागे आरामात उभं राहून विड्या फुकत काम करतो. पण गेल्या महिन्यात मला नऊशे रुपये पगार मिळाला. रोजचे तीस रुपये. शेतीकामात मिळत होते त्याच्या दसपट! तेही भरपूर आरामाचं काम करून!"

 हे सांगताना त्या तरुणाचे डोळे जुन्या श्रमांच्या आठवणीने पाणावले होते. शेतातील श्रम व कारखान्यातील श्रम यांचे बाजारात जे मोल केले जाते, त्यातील ही जबरदस्त तफावत जोशींनाही अस्वस्थ करून गेली. अर्थात कारखान्यात अशी नोकरी मिळायचे भाग्यही शंभरात एखाद्यालाच लाभणार.

 स्वतःची शेती सुरू करता करता जेवढे शक्य होते तेवढे ग्रामविकासाचे प्रयत्न त्या सुरुवातीच्या काळात जोशींनी केले. रोगराई कमी व्हावी म्हणून स्वच्छता मोहिमा काढल्या. गाव हागणदारीमुक्त व्हावे म्हणून चराचे संडास खणले. श्रमदानाने कच्चे का होईना पण रस्ते बांधले. विहिरीत साठलेला गाळ उपसून काढायची योजना राबवली. शाळेचा दर्जा सुधारावा म्हणून ग्रामपंचायतीकडे साकडे घातले. साक्षरता वर्ग चालवले. वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना व्हावी म्हणून अधिकाऱ्यांना गावात बोलावून आणले. पारंपरिक समाजसेवेच्या सगळ्या वाटा चोखाळून झाल्या; पण असल्या प्रयत्नांच्या मर्यादाही हळूहळू त्यांच्या लक्षात येत गेल्या. मागासलेपणाचे सर्वांत मोठे कारण गरिबी हे आहे. ती जोवर दर होत नाही तोवर इतर कुठल्याच उपायांना अपेक्षित ते यश मिळणार नाही, आणि त्यासाठी शेतीमालाला अधिक भाव मिळायला हवा हे उघड होत गेले.

 जोशी सांगत होते,

 “एक साधं उदाहरण देतो. आंबेठाणमध्ये सुरुवातीच्या काळात साफसफाईचं खूप काम मी केलं, पण तरीही आमच्या आंबेठाणपेक्षा शेजारचं भोसे गाव अधिक स्वच्छ होतं. तिथली जमीन खडकाळ नव्हती व अधिक सुपीक होती, फळं व भाजीपाला तिथे खूप यायचा, हे खरंच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या गावचा कांदा अधिक चांगल्या दर्ज्याचा होता

९४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा