Jump to content

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांना चपखल लागू पडेल, असेच भजन त्यांनी फारशी चर्चा न करताच निवडले होते. जोशी लिहितात,

या निरक्षर अडाण्यांनी, मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. मृदंग-झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून भजनाचा अर्थ असा काही भिडला, की गळ्यातला आवंढा गिळवेना.

 या प्रसंगानंतर ह्या गरीब बिचाऱ्या मजुरांसाठी आपण ठोस काहीतरी केलेच पाहिजे असे त्यांनी ठरवले. भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा अधिक बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची निरीक्षणे अतिशय अस्वस्थ करणारी होती. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीपासून आणि झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगनगरीपासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणसारख्या गावात अशी परिस्थिती असावी, देश स्वतंत्र होऊन तीस वर्षे उलटल्यावरही ती तशीच राहिलेली असावी, हे खूप विषण्ण करणारे होते.

 आंबेठाण गावात वीज जवळ जवळ कुठेच नव्हती आणि जिथे होती तिथेही ती वरचेवर खंडित व्हायची. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळे व्यवहार ठप्प व्हायचे. घरातही एखाददुसरा मिणमिणता कंदील. करमणूक अशी कुठलीच नाही. शिवाय, वीज नसली की शेतीला पाणी कुठून आणणार? जिथे विहीर असायची तिथे पंप चालवले जात. शेतीला पाणी मिळावे म्हणून. पण डिझेलचाही प्रचंड तुटवडा. खुल्या बाजारात ते कधीच उपलब्ध नसे. मामलेदाराकडे जाऊन खूप खटपट केल्यावर परवाना मिळायचा पण तोही महिन्याला फक्त वीस लिटरचा. म्हणजे रोजचे साधारण ७०० मिलीलिटर. पंप धुवायलाही ते अपुरे पडायचे! मग त्यात रॉकेलची भेसळ करणे आलेच. खरे तर तेही पुरेसे कधीच मिळत नसे; त्यालाही रेशन कार्ड लागायचे. फारच थोड्या जणांकडे ते असायचे. बाकीच्यांना जादा पैसे देऊन ते मिळेल तिथून खरेदी करावे लागे. या भेसळीत इंजिनची नासाडी व्हायची; दुरुस्तीचा खर्च बोकांडी बसायचा. पण पंप चालवला नाही तर कांद्याला पाणी देणे अशक्य आणि मग तयार पीकही जळून जायची भीती.

 गावात एकाच्याही घरी संडास नव्हता: बायाबापड्यांनाही उघड्यावरच बसावे लागे. कुठल्याच घरात नळ नव्हते. पिण्यासाठी साधारण शुद्ध असेही पाणी उपलब्ध नव्हते. कुठूनतरी घमेल्यातून मिळेल ते पाणी आणायचे, तोंडाला पदर लावून तेच प्यायचे; त्यातून गाळले जाईल तेवढे जाईल. त्यामुळे रोगराई प्रचंड. खरे तर बरेचसे रोग हे स्वच्छतेच्या साध्यासुध्या सवयी लावल्या तरी दूर होऊ शकणारे. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे, धुतलेले कपडे घालणे, रोज अंघोळ करणे, भांडीकुंडी नीट घासून घेणे, केरकचरा व्यवस्थित गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे ह्या सगळ्या, म्हटले तर अगदी साध्या गोष्टी. पण इथे कोणीही यांतले काहीच करत नसे. त्यामुळे गावात बहुतेक सर्वांना खरूज झालेली असे. कॉलरा,

मातीत पाय रोवताना९३