Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मायदेशी परत आल्यापासून आयुष्याला काही दिशा सापडते आहे असं वाटलं. जेवण झाल्यावर दोन तरुणांनी गावात जाऊन उद्या सकाळी प्रत्येक घरच्या दोघादोघांना गोळा करून आणण्याची हमी देऊन गावाकडे प्रस्थान ठेवले. एक दोन तशीच सटकली. आम्ही सहा जण दगडांच्या रचलेल्या भिंतींच्या आडोशात डोंगरातील वाऱ्याच्या भणभणाटात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नवीन कोणीच आले नाही. गावातल्या कोणत्या तरी मर्तिकाची बातमी लागली. राहिलेले भूमिपुत्रही लगबगा गावाकडे जाऊ लागले.

 अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ लागली. तेव्हा मी सगळ्यांना एकदा विचारले, "तुमची अडचण तरी काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर मला मोकळे करा."

 "वा, वा! असं कुठं झालंय? तुम्ही गेला म्हणजे सगळंच कोसळंल बघा. मग तर आम्हाला तोंडात मातीच घालावी लागेल अन् तो मालक आम्हाला आता जगू देईल का? साहेब, असं करू, जरा बेताबेतानंच घेऊ, मालकाला एकदम चिडवणं बरं नाही..." वगैरे, वगैरे, वगैरे.


 माझ्या एकूण प्रकरण लक्षात आलं. एव्हाना हजार दोन हजार मी पदरचे खर्चुन बसलो होतो. अकरापैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगर शेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. माझ्यासारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक करून दाखवायचे कौशल्य त्यांना जमले होते. गावकऱ्यांपढे त्यांचे नाटक चालत नव्हते. त्यांना जमीन कसायची नव्हती. पुढेमागे खरीददार सापडला तर विकून दोन पैसे करायचे होते आणि जमले तर हस्तांतरित जमिनी म्हणून त्या कदाचित परतही मिळवायच्या होत्या.



 ....पण यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते. विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून शेती करायची म्हटले तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे. याचा उलगडा मला स्वत:ला त्या वेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळलं होतं. भूमिपुत्रांनाही ते कळलं होतं; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचं गुह्यतम गुह्य आणखी उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.

अंगारमळा । १४