Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामील व्हायचे. व्हा माझ्या जमिनीच्या बाहेर; म्हणजे मग सगळेच मुसळ केरांत जायचे. शेतीचे नाव ठरले, 'अकरा भूमिपुत्र'.


 एक एक गमतीची गोष्ट लक्षात आली. या अकरापैकी तीनच खऱ्या अर्थाने भूमिहीन होते. त्यांच्या घरचे पुण्या-मुंबईला नोकरीत होते. त्यांना शेती नावावर झाली यात आनंद होता. वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी जमीन मिळावी याकरिता पैसा खर्चही केला होता; पण जमीन कसण्यात त्यांना मनातून काहीही उत्साह नव्हता. माझ्यासमोर, अधिकाऱ्यांसमोर जमीन कसण्याबाबत आपल्या उत्साहाचे प्रदर्शन करण्यात मात्र त्यांची अहमहमिका चाले. बँकेकडून कर्ज मिळवायची व्यवस्था मी खेटे घालून घालून करून आणली. बरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र; बाकीचे सगळे घरच्या कामासाठी गुंतलेले. एकोणीसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वत:लाच धीर देत होतो. आपल्यावर विश्वास ठेवण्यासारखे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांनी निरुत्साह दाखवावा हे साहजिकच नाही, योग्यही आहे. काम उभे राहील तस तसा त्यांचा विश्वास वाढेल.


 जमीन डोंगराच्या कपारीत उतरणीवर, बांधबंदिस्तीचे मोठे काम करणे जरूर होते. संबंधित खात्याच्या मंडळींनी काम करून देणे कबूल केले. अट एक-कामाकरिता रोजावर लावायची माणसे जागेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. मी आनंदाने कबूल केले. तालुक्याच्या गावाहून दावडीला आलो. दोन चार भूमिपुत्र भेटले. त्यांना निरोप दिला, दोनचार दिवसांत आपण शेतीवर राहायला जायचे. प्रत्येक नवभूधारकाच्या घरातली दोन माणसे तरी राहायला आली पाहिजेत. बांधबंदिस्तीचे काम आपणच केले तर पदरचा खर्च करावयाच्या ऐवजी मजुरी मिळेल. जे गैरहजर राहतील त्यांना वेगळा भार द्यावा लागेल.


 ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडता दावडीला गेलो. कोणत्याच घरचे कोणीच सापडेना. तास दोन तासांत चार घरातली नऊ माणसं हाती लागली. त्यांना माझ्या जीपमध्ये घालून त्यांच्या जमिनीवर नेले. जमिनीवर अफाट दगडगोटे गोळा करायला सुरुवात झाली. दगड लावून घेऊन पहिल्यांदा रात्रीकरिता आडोशाच्या भिंती करून घ्यायला सुरुवात झाली. संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशात सगळ्यांनी भाकऱ्या खाल्ल्या.

अंगारमळा । १३