पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या विषयाच्या सखोल अभ्यासात मार्क्स शिरत नाही. किंबहुना भांडवलशाही व्यवस्थेत खेड्यांवर शहरी प्रभुत्व प्रस्थापित होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक ग्रामीण जीवनाच्या येडपटपणातून सुटू शकतात याचे त्याला समाधानच वाटते. कारण शेतीचा प्रश्न हा इतिहासजमा झालेला कालबाह्य प्रश्न आहे. इतिहास उद्योगधंद्यांच्या वाढीत घडत आहे. नव्या समाजक्रांतीची बीजे कारखान्यांतील कामगारवर्गातच आहेत ही त्याची धारणा होती आणि मार्क्सच्या दृष्टीने जग समजून घेण्यापेक्षाही जग बदलणे जास्त महत्त्वाचे होते.

 शेतकरी समाजाला तो बटाट्याच्या पोत्याची उपमा देतो. लढाऊ आघाडी उभारण्याला शेतकरी स्वत: असमर्थ असतो. यासंबंधी १८४८ च्या फ्रेंच उठावानंतर त्याची बलवत्तर खात्री झाली. त्यामुळे मार्क्सवादाचे सर्व लक्ष औद्योगिक कामगारांवर केंद्रित झाले आणि तिच्या प्रश्नाची सुटका ही यथावकाश सामुदायिक आधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या शेतीने होईल अशी भविष्यवाणीही मार्क्सने केली.

 शेकापची सैद्धांतिक भूमिका ही मार्क्सवादाशी सुसंगत आहे. मोठ्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या छोट्यांच्या शोषणाचा जागोजाग उल्लेख पक्षाच्या ठरावात सापडतो. सामुदायिक आधुनिक शेतीचा पुरस्कारही पक्ष करतो आणि कामगारांच्या नेतृत्वाखालीच शेतकरी स्वत:ची मुक्तता करून घेऊ शकतो. एरवी शेतकऱ्यांची प्रवृत्ती ही फुटून जाण्याची असते. (दाभाडी ठराव)

 मार्क्सवाद बरा असो वाईट असो. येथपर्यंत शेकाप त्याच्याशी निदान सैद्धांतिक निष्ठा प्रामाणिकपणे ठेवतो; पण मार्क्स जेथे शहरी प्रभुत्वाचे कौतुक करतो, शेतीतील फायदा वाढवण्याच्या प्रवृत्तीस प्रतिक्रांतिकारक समजतो तेथे मात्र शेकाप शेतीच्या व्यवसायात फायदा झाला पहिजे हे कलम, 'मार्क्सवादावरील मूलभूत ग्रंथाच्या' आधाराखेरीज घुसडून देतो.

 शेतीमालाचे भाव, शेती व बिगरशेती क्षेत्रांमधील देवघेवीच्या अटी यांसंबंधी मार्क्सनंतरच्या साम्यवादी विचारवंताचे मतही पाहण्यासारखे आहे.

 मार्क्सवादाचे कुंकू मिरवणारी पहिली क्रांती झाली रशियासारख्या त्या वेळी प्रामुख्याने शेतीप्रधान असलेल्या देशात. क्रांतीनंतरची पहिली दहा वर्षे शेतीमालाच्या भावाच्या प्रश्नावर रशियात मोठे वादंग माजले. त्या वादंगाचा अंत १९२९ मध्ये स्टॅलिनने बड्या शेतकऱ्यांचे शिरकाण करून केला.

 छोट्यामोठ्या शेतकऱ्यांचा मिळून बनलेला वर्ग हा भांडवली प्रवृत्तीचा बालेकिल्ला आहे. खासगी व्यापाराच्या जागी सरकारी लेव्ही व वाटपाची पद्धत आवश्यक आहे असे ट्रॉटस्की व लेनिन या दोघांचेही मत होते. लेनिन जास्त व्यावहारिक

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १४६