पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिली कादंबरी १८८२च्या सुमारास प्रकाशित झाली. हिंदी कादंबरी समीक्षेतील मान्यवर विज्ञान डॉक्टर गोपाल राय यांनी राजस्थानची पहिली हिंदी कादंबरी ‘आश्चर्य वृत्तांत' (पं. अम्बिकादत्त न्यास) ही सन १८६२ मध्ये लिहिली गेल्याचा दावा केला आहे. हिंदी कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात ज्या मेहता लज्जाराम शर्माच्या 'स्वतंत्र रमा और परतंत्र लक्ष्मी', ‘हिन्दू गृहस्थ', ‘आदर्श दम्पत्ति' या कादंब-या गाजल्या ते मेहता हे राजस्थानचेच. स्वातंत्र्यपूर्ण काळापर्यंत हिंदी कादंबरीच्या क्षेत्रात सातत्याने लेखन करायची परंपरा राजस्थानी कादंबरीकारांनी टिकवली आहे. तीच गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळाची. स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानी कादंबरीकारांनी सुमारे चारशे कादंब-यांची हिंदीत भर घातली आहे. संख्यात्मक वृद्धीबरोबर गुणात्मक योगदानातही राजस्थानी कादंबरीकार आघाडीवर राहिले आहेत.

 स्वातंत्र्योत्तर काळात रांगेय राघव, मणि मधुकर, डॉ. पुरुषोत्तम आसोपा, यादवेन्द्र शर्मा चन्द्र', श्री. गोपाल आचार्य यांसारख्या कादंबरीकारांच्या रचना उल्लेखनीय म्हणून सांगता येतील. 'हजुर', 'मुर्दोका टीला, ‘दायरे', ‘कब तक पुकारू' या आपल्या कादंब-यांतून रांगेय राघवांनी शोषण, साम्राज्यवाद, हुकूमशाही, विषमता इत्यादीबद्दलचा असंतोष व्यक्त केला आहे. मणि मधुकर लिखित ‘पत्तों की बिरादरी’, ‘सफेद मेमने' या कादंब-या राजस्थानी जनजीवन अभिव्यक्त करताना दिसून येतात. ‘पाँव मे आँखवाले' ही यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' ची कादंबरी महानगरी जीवनातील मूल्य संभ्रमण चित्रित करते. ‘साक्षी है क्षिप्रा’, ‘शाह और शिल्पी', 'अमृतपुत्र' सारख्या ज्ञान भरिल्लंच्या कादंब-यांनी ऐतिहासिक कथाविश्व निर्माण केलं आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळात कवितेनंतरची गतिशील साहित्य विधा म्हणून कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. राजस्थानी कादंबच्यांनी हिंदी कादंब-यांत अनुभव, शैली, जीवन संस्कृती इत्यादींची विविधता आणली. कादंबरीस जीवनाभिमुख करण्यात या कादंब-यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रांगेय राघवसारखा सशक्त कादंबरीकार हे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यास लाभलेले वरदानच म्हणावे लागेल. राजस्थानातील गोष्टींचे सूक्ष्म चित्रण झाले आहे. ते वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. साहित्याच्या अन्य प्रांगणांप्रमाणे राजस्थानी कादंबरीनेही हिंदी कादंबरी साहित्यास समृद्ध केले आहे. ही समृद्धी परिमाण व परिणाम या दोन्ही कसोट्यांवर पारखून घेता येईल इतकी स्पष्ट आहे. प्रारंभापासून ते आजपावेतो राजस्थानी कादंबरीने हिंदी साहित्यात मोलाची भर घातली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

शब्द सोन्याचा पिंपळ/१३७