पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९४२ सालानंतर एकावन्न वर्षांनी सूर्य मावळताना पुन्हा एकदा आपण तीच शपथ घेत आहोत.
 सरकार बुडत चाललं आहे. समाजवादाच्या नावाखाली, नेहरूशाहीच्या नावाखाली दिल्लीमध्ये बसून डुढ्ढाचार्यांनी लक्षावधी लोकांना लुटण्याचं षडयंत्र आजपर्यंत रचलं त्याचा अंत होतो आहे. मॉस्कोत त्याचा अंत झाला, दिल्लीमध्ये अंत झाला आणि डंकेल प्रस्तावाच्या निमित्ताने पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येही त्याचा अंत झाला.
 आपल्या देशात ओरड चालू आहे की बाहेरच्या कंपन्या 'डंकेल'च्या मदतीने आल्या तर त्या 'ईस्ट इंडिया कंपनी' होणार नाहीत काय? सुभाषचंद्र बोसांनाही असंच विचारण्यात आलं होतं, हे जापानी म्हणजे नाझी आहेत. जर्मन म्हणजे हुकूमशहा आहेत, त्यांची मदत कशासाठी घ्यायची. नेताजींनी त्यांना उत्तर दिलं होतं की, "गुलामांना कोणी मित्र नसतात, गुलामांना तत्त्वांशी काही देणेघेणे नसते. गुलामांना फक्त स्वतंत्र व्हायचं असतं."
 आज आमच्या उरावर बसलेल्या इंडियाला दूर करण्याकरता मला 'ईस्ट इंडिया कंपनी'ची मदत घ्यायला लागली तर ती सुद्धा घेऊन पुढे जायला तयार आहोत. पुढे त्यांच्याशी लढाई कशी करायची हे आम्ही ठरवू, पण आम्हाला लुटणाऱ्या इंडियावाद्यांनी 'ईस्ट इंडिया कंपनी'चा धाक आम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नये.
 सूर्य मावळण्याच्या आधी, जाणीवपूर्वक, सविस्तर भाषण न करता पुढील कार्यक्रमाचा आराखडा सांगितला. आज इथून निघताना तुमचा निरोप घेऊन निघतो आहे. अशा तऱ्हेचे आंदोलन केल्याचे काय परिणाम आहेत, काय जबाबदारी येते याची मला जाणीव आहे.
 तुम्ही आजपासून स्वतंत्र आहात. तुम्ही आजपासून 'नाना पाटील ब्रिगेड'चे सैनिक आहात. शेतकऱ्यांवर अन्याय करणारा जो जो म्हणून हुकूम असेल तो तो तोडण्याचं तुमचं कर्तव्य आहे. मी तुरुंगात असो, माझे सहकारी तुरुंगात असोत किंवा नसोत, हे आंदोलन शेवटपर्यंत लढवत ठेवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि इथंच तुमची रजा घेतो.

(३१ ऑक्टोबर १९९३ - खुले सत्र, शेतकरी संघटना पाचवे अधिवेशन औरंगाबाद,)
(शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर १९९३)

◼◼

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ९७