Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६४०
 


डेकार्ट
 निबंध, ग्रंथ, ऐहिक प्रपंचाचे विवेचन यात बुद्धीला आवाहन करावे लागते, असे वर म्हटले आहे. ते करावयाचे म्हणजे शंका, आक्षेप, विरुद्ध पक्ष हे सर्व आलंच. पण अध्यात्मात याचे अगदी वावडे असते. श्रद्धा हा अध्यात्माचा, परमेश्वरप्राप्तीचा पाया आहे. त्यात मूलतत्त्वांच्या बाबतीत पूर्वपक्ष असले तरी, भक्तांना ते सर्व वर्ज्य आहे. आणि प्राचीन मराठी साहित्यात भक्ती हाच प्रधान विषय होता. आख्यानकवींच्या काव्यातही रोख सगळा भक्तीकडेच होता. त्यामुळे शंका, अश्रद्धा, आक्षेप हे ते पाप समजत. उलट युरोपात रेनी डेकार्ट याने युरोपीयांना शंका, आक्षेप घेण्यास शिकविले, म्हणून त्याला अर्वाचीन युरोपचा जनक मानतात. पण त्याच्या आधीच तेराव्या चौदाव्या शतकापासूनच मार्सिलियो, विल्यम ऑफ ओकहॅम, पीटर डुबाईस, वायक्लिफ, जॉन हस यांनीही आक्षेप घेण्याची, धर्मपीठाशी संग्राम करण्याची वृत्ती प्रगट केली होती. आणि हळूहळू ती सर्व युरोपात पसरली. त्यामुळेच तेथे सामान्यजनांना व्यक्तित्व प्राप्त झाले. भौतिक विद्येचे प्रधान कार्य मनुष्याला व्यक्तित्व प्राप्त करून देणे हे आहे. तसा भारतात- महाराष्ट्रात- प्रयत्न सुद्धा झाला नाही. अशा स्थितीत व्यक्तित्वसंपन्न असा जो इंग्रजी समाज, त्याच्याशी मराठ्यांची गाठ पडली. त्यात त्यांचा विजय होणे शक्यच नव्हते.

शाहीर त्यांतलेच
 शाहिरांनी ऐहिक विषयांवर लिहिले. पण त्यांच्या मनोवृत्तीत इतर साहित्यिकांपेक्षा कसलाच फरक नव्हता. त्यांनी काही ग्रंथ लिहिले नाहीत. ज्या भौतिक विद्येची महती वर सांगितली आहे, ती त्यांच्याजवळ नव्हती. जयापजय हे पापपुण्यावर अवलंबून असतात, असेच ते मानीत असत. सवाई माधवरावाला ते अवतार मानीत असत. तो मृत्यू पावला तेव्हा, क्षीरसागरातून त्यांना तसे सांगितले गेले, म्हणून ते गेले, असे शाहीर म्हणतात. पेशव्यांचे राज्य बुडाले ते कलियुगामुळे बुडाले, असे शाहीर सांगत असत. ही भौतिकविद्या नव्हे. इतिहास, अनुभव, तर्क, परिस्थिती, कार्यकारणमीमांसा यांना भौतिक विद्येत महत्त्व असते. शाहिरी काव्यात यातले काहीच नाही. याची त्यांना कल्पनाही नव्हती. इतरांनी रामकृष्णांविषयी लिहिले. त्यांनी नाना, सवाई माधवराव यांच्यावर लिहिले. हा फरक, मागे सांगितल्याप्रमाणे, मोठा असला तरी आपल्या विषयाच्या दृष्टीने इतर कवी आणि शाहीर यांच्यांत कसलाही फरक नव्हता. त्यांच्याइतकाच भौतिक विद्येशी यांचा संबंध होता.

विचारही नाही
 मराठ्यांना अखिल हिंदुस्थानात मराठा साम्राज्य स्थापावयाचे होते. हिंदुपदपात-