(१) आम्ही मराठे
वतनदारी, तर्फदारी, मिरासदारी यांमुळे महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीच फक्त खुंटली असे नाही, तर त्यामुळे मराठा समाज हा समाजच राहिला नाही अशी अवस्था झाली. बहुतेक सर्व देशमुख, सरदार, वतनदार यांचे एकमेकांत पिढ्यान पिढ्यांचे हाडवैर असे. आणि त्यांच्यात रक्तपात, कत्तली ही नित्याचीच स्थिती झाली होती. त्यामुळे सर्व समाज मिळून, मराठे काही कार्य करतील, त्यांच्यांत काही संघशक्ती निर्माण होईल हे शक्यच नव्हते.
वतनदारीचा रोग
पण याहीपेक्षा एक वाईट गोष्ट होती. दोन भिन्न तर्फदार किंवा देशमुख घराण्यामध्येच असे रक्तपात किंवा खून होत असे नाही. एकाच घराण्यातील भावाभावातही असेच प्रकार चालत. भिन्न घराण्यांतील हाडवैराची एकदोन उदाहरणे मागे दिलीच आहेत. आता भाऊबंदांच्या हाडवैराची उदाहरणे पाहा. मसूरच्या जगदाळे देशमुख घराण्यातील जगदेवराव यास चार मुलगे. बाबाजीराव हा पहिल्या बायकोचा आणि रामाजी, विठोजी व दयाजी हे तीन दुसऱ्या बायकोचे, जगदेवांनी केलेल्या मिळकतीच्या वाटण्या या भावांना पसंत पडल्या नाहीत; त्यामुळे एकमेकांवर मारेकरी घालणे सुरू झाले. त्यात रामाजी व दयाजी यांचे खून पडले, विठोजी पळून गेला. बाबाजीरावाच्या मुलांच्यावर हीच आपत्ती आली. त्यात त्याच्या एका मुलाचा खून पडला. त्याची बायको लपून राहिली म्हणून वाचली.