Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२६२
 

वर्षांनी तेथे पोर्तुगीज सत्ता स्थापन होऊन ते महत्त्वाचे बंदर हिंदूंच्या हातून कायमचे गेले.
 १४९० ज्या सुमारास बहामनी राज्याची सत्ता संपुष्टात आली आणि त्याचे पाच तुकडे पडून महाराष्ट्रात पाच भिन्न शाह्या प्रस्थापित झाल्या. त्यामुळे मुस्लिम सत्ता अगदी कमजोर झाली. याच वेळी विजयनगरच्या सत्तेला नरसनायक, वीर नरसिंह व कृष्णदेवराय (१४९० ते १५२९) असे प्रबळ सम्राट लाभले. त्यामुळे त्यांनीच भंगलेल्या बहामनी सत्तेवर आक्रमण करून ती अगदी खिळखिळी करून टाकली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांनी अनेक वेळा ऐक्य करून विजयनगर- विरुद्ध जिहाद पुकारला. पण त्या प्रबळ सम्राटांपुढे त्यांचे काही चालले नाही. १५३० नंतर विजयनगरची सत्ता हळूहळू दुबळी होऊ लागली आणि १५६५ साली वरील शाह्यांनी पुन्हा एकदा जिहाद पुकारला व राक्षस तागडी येथे त्या सत्तेचा पूर्ण पराभव केला. पण तो इतिहास पुढे येईल. बहामनी सत्तेचा भंग होऊन तिची पाच शकले झाली याचा थोडासा वृत्तांत आधी पाहावयाचा आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासातील ती फार महत्त्वाची घटना आहे.

पाच तुकडे
 सुलतान महंमदशहा २ रा (१४६३ - १४८२) याने आपला कर्तबगार वजीर महंमद गवान यास स्वामिद्रोहाच्या संशयावरून ठार मारल्याचे वर सांगितलेच आहे. महंमद गवानच्या कर्तृत्वानेच गेली वीस पंचवीस वर्षे बहामनी सत्ता अनेक संकटांतून वाचली होती. तो जाताच तिला तडे जाण्यास सुरुवात होऊन त्या एका राज्याची लवकरच पाच राज्ये झाली. बहामनी राज्याच्या सरदारांनीच, केन्द्रसत्ता दुबळी झाल्यामुळे आपापल्या सुभेदारीच्या प्रदेशात ही राज्ये स्थापन केली होती. बहामनी सुलतान दुसरा महंमद याच्या नंतरचे सुलतान इतके दुबळे होते की त्यांच्या या सुभेदारांना स्वतंत्र होण्यास मुळीच प्रयास पडले नाहीत. इ. स. १४८४ स.ली वऱ्हाडचा सुभेदार इमाद उल्मुल्क याने गाविलगड येथे स्वतंत्र इमादशाही स्थापन केली. १४८९ साली अहंमद निजाम उल्मुल्क याने नगर येथे निजामशाहीची स्थापना केली. त्याच साली विजापूरचा सुभेदार यूसफ आदिलशहा याने विजापूर येथे आदिलशाही हे राज्य स्थापिले. बहामनी राज्याची बेदर ही राजधानी होती. कासीम बेरीद हा तेथला सुभेदार होता. सुलतान दुबळा होताच त्याने त्याला ठार मारून इ. स. १४९२ साली ते तख्त बळकाविले. बेदरची बेरीदशाही ती हीच. आंध्रप्रदेशातील गोवळकोंड्याच्या सुभ्यावर कुली कुतुब उलमुल्क हा सुभेदार होता. जुना वरंगळ प्रदेश तो हाच. १५१२ साली कुतुबशहाने तेथे कुतुबशाही स्थापिली. आणि अशा रीतीने बहामनी सत्ता पंचधा भग्न झाली.