Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सत्ता राखता आली नाही, हा अनुभव काँग्रेसेतर सगळ्याच पक्षांचा आहे.
 नरसिंह राव साहेबांच्या बढाईने काँग्रेसबाहेरील सर्वांनाच अंतर्मुख होऊन काही विचारचिंतन करण्याची संधी मिळाली आहे. या देशावर काँग्रेसचीच सत्ता राहणे अपरिहार्य आहे काय? काँग्रेसखेरीज देशाला पर्याय नाही काय? असे असेल तर त्याची कारणे काय? या सर्व पक्षांचा विचार आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी मागे एकदा जाहीररीत्या म्हटल्याचे वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले होते, की काँग्रेसच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सत्ता टिकवण्याची जेवढी जाणबूज असते तेवढी विरोधी पक्षाच्या पंतप्रधानांनादेखील नसते. तात्पर्य, काँग्रेसला पर्याय नाही. त्यांनी कितीही गलथानपणे राज्य केले, भ्रष्टाचार केला, लूटमार केली; तरी काँग्रेसच सत्तेवर राहणार. कारण, विरोधकांत सरकार चालवण्याची क्षमताच नाही. शरद पवारांच्या या मग्रुरीमागे काही तथ्य आहे काय?
 योगायोग असा, की याच वेळी मधू लिमये यांचे जनता पक्षाच्या राजवटीच्या अनुभवांसंबंधी एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. जनता पक्षाच्या काळात समाजवादी आणि जनसंघवादी एकमेकांच्या कुरापती काढत राहिले, एवढेच नाही तर, जाहीररीत्या भांडततंडत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुहेरी निष्ठेचा मोठा कडाक्याचा वाद झाला आणि जनता पक्षाचे राज्य कोसळले. या सगळ्या प्रकरणात मधू लिमये यांचा मोठा हात होता. किंबहुना, जनता पक्षाचे सरकार पाडण्याचा बहुतांश दोष मधू लिमये यांचाच आहे असे मानले जाई. त्यामुळे मधू लिमयेंचे आत्मकथन महत्त्वाचे आहे.

 त्यांनी अर्थात, आपल्या अंगावरचा दोषारोप झटकून टाकला आहे. जनता पक्षाची स्थापनाच मुळी चुकीच्या पायावर झाली. इंदिरा गांधी आणि आणीबाणी यांच्यविषयीच्या दाहक अनुभवांमुळे विरोधक तात्पुरते एकत्र आले. त्यांत चौधरी चरणसिंग, मोरारजी देसाई, जे. बी. कृपलानी यांचे व्यक्तिगत संघर्ष याचे मोठे चित्तवेधक वर्णन मधू लिमये यांनी केले आहे. ते स्वतः, जॉर्ज फर्नाडिस आदींनी सत्तेच्या अल्पकाळात उतामाताला येऊन, काही मर्कटलीला केल्या. त्याचे अर्थात, तपशीलवार विश्लेषण लिमयांच्या पुस्तकात विस्ताराने नाही; पण त्यांचाही निष्कर्ष असा, की जे घडले ते अपरिहार्य होते. मधू लिमयांच्या या पुस्तकाच्या निमित्तानेही पुन्हा प्रश्न उभा राहतो, की काँग्रेसला खरोखर पर्याय नाही काय ?

पोशिंद्यांची लोकशाही / ६४