Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सर्वसामान्य परिस्थितीतल्या माणसाला कापडबाजाराकडे फिरकण्याची सोय राहिलेली नाही, इतके सर्व तऱ्हेच्या कापडांचे भाव भडकलेले आहेत.

 ग्राहक-उत्पादक लुटले जात आहेत. गिरणीमालक, अधलेमधले दलाल दुकानदार यांची मात्र चंगळ चालू आहे.

 कापड ही एक जीवनाश्यक वस्तू आहे व जाडाभरडा का असेना, अंगभर कपडा प्रत्येकाला रास्त व परवडणाऱ्या भावात मिळाला पाहिजे, अशी मागणी निर्धारपूर्वक करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

 या मागणीसाठी ' ऑपरेशन लक्ष्मीरोड' हा कार्यक्रम योजण्यात आलेला आहे.

 कार्यक्रम अगदी साधा पण परिणामकारक आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर (७४) सायंकाळ ते ३ नोव्हेंबर सायंकाळ या तीन दिवसात कुणीही कसलेही कापड विकत घेण्यासाठी, लक्ष्मीरोडवर किंवा अन्य ठिकाणच्या कापड दुकानात पाऊलसुद्धा टाकावयाचे नाही. तीन दिवस कापड बाजारावर लोकांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार टाकावयाचा आहे. प्रमुख दुकानांवर शांततापूर्ण निदर्शनेही ( Picketing ) करावयाची आहेत.

 कोटयवधी जनता ज्या देशात उघड्यानागड्या स्थितीत रहात आहे त्या देशात हा तीन दिवसांचा बहिष्कार म्हणजे फार मोठा त्याग आहे असे नाही. पण चालू उत्पादन व वितरण व्यवस्थेसबंधी आपला निषेध परिणामकारकरीत्या नोंदविण्याचा दुसरा सरळ मार्ग सध्यातरी कुणाच्या दृष्टिपथात नाही. म्हणून हा कार्यक्रम सर्वांनी उचलून धरला पाहिजे.

 तीन दिवस संपूर्ण बिहार बंद ठेवून जयप्रकाशांनी भ्रष्टाचार-महागाई-बेकारी विरुद्ध सर्वत्र चालू असलेल्या आंदोलनातील एक नवा उच्चांक स्थापन केलेला आहे. 'निदान तीन दिवस लक्ष्मीरोड बंद ठेवून पुणेकर स्त्री-पुरुष नागरिकांनी भ्रष्टचार-महागाई- बेकारी विरोधी लढ्यातील आपला अल्पसा वाटा का उचलू नये?'......

 मध्यमवर्गानेच फक्त उचलून धरावी अशी काही ही भूमिका नाही. परिवर्तनासाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाशी या भूमिकेचे काहीएक नाते आहे. एका टोकाला उत्पादकाचा विचार आहे. दुसरे टोक ग्राहकाच्या हातात दिले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेवरील दलालमध्यस्थ वर्गाची पकड सैल करणे हे व्यापक उद्दिष्ट म्हणून सांगितलेले आहे. कारण भाववाढ–महागाई व आर्थिक अरिष्ट याचे हे आपल्याकडील एक प्रमुख कारण आहे. अनुत्पादक घटकांचे वर्चस्व आपण कमी करीत नाही तर भाववाढ–महागाई आपल्याला रोखता येणार नाही, हे यामागील विचाराचे सूत्र आहे. कापडाचे भाव उतरवणे, पंचवीस-तीस टक्क्यांनी खाली आणणे हे 'ऑपरेशन लक्ष्मीरोड' चे अगदी ढोबळ, तात्कालिक व वरवरचे उद्दिष्ट होते.

ऑपरेशन लक्ष्मीरोड । ९३