* आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे सेनादल देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात चोवीस तासाच्या आत नेऊन खडे करणे या लॉ अँड ऑर्डरवाल्यांना सहज शक्य आहे.
* नोकरशाही यंत्रणा दीर्घसूत्री असली तरी अनुभवी व संघटित आहे.
* एका मागून एक निवडणुका खुल्या वातावरणात व्यवस्थित पार पडत आहेत, जनता आपल्याला हवे ते प्रतिनिधी राज्यकर्ते म्हणून पाठवू शकत आहे.
* केंद्रसत्ता पारतंत्र्य काळातही मजबूत व एकछत्री होती.
* पारतंत्र्यविरोधी आंदोलनही विस्कळित, तुटक-फुटक व उद्रेकी स्वरूपाचे न होता, एका अखंड व अतूट सूत्राने बरेचसे बांधले गेलेले होते.
* स्वातंत्र्य मिळाल्यावरही देशात पहिली पंचवीस वर्षे स्थिर व एकपक्षीय शासन अस्तित्वात आहे.
* देशातील निदान एकतृतीयांश जनतेला या शासनाने पुरेसे खाऊपिऊ घातलेले आहे. विकासाचे, प्रगतीचे काही भरीव कार्य येथे गेल्या पंचवीस वर्षात उभे आहे.
* सहिष्णुतेची दीर्घ परंपरा जनमानसात खोलवर रुजलेली आहे.
* स्वतंत्र व स्वायत्त सांस्कृतिक संस्था लोकजीवनाची अंगोपांगे समृद्ध करीत आहेत.
* मध्यमवर्ग अद्याप कोसळलेला नाही.
* जमीनदार आणि भूमिहीन यांच्यामधली लहान शेतकऱ्यांची संख्या अतिप्रचंड आहे.
* देशातील सर्व जनता गेली शे-दीडशे वर्षे निःशस्त्र आहे.
-नक्षलवादी क्रांतीला प्रतिकूल अशी ही सर्व आपल्याकडील पार्श्वभूमी आहे.
म्हणनच नक्षलवाद-नक्षलवाद या नावाखाली सातपुड्यातील आदिवासी भिल्लांचे, किसानांचे, भूमिहीनांचे, गोरगरिबांचे आंदोलन धोपटून काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चुकीचा आहे, हास्यास्पद आहे.
तसाच इथला प्रश्न केवळ लॉ अँड ऑर्डरचा नाही. आहे तो सामाजिक-आर्थिक असमतोल कायम ठेवून शांतता आणि सुव्यवस्था टिकविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो तात्पुरता, वरवरचा, म्हणूनच फोल ठरणार, हे उघड आहे.
प्रश्न येथले आहेत प्राथमिक. अगदी मूलभूत.