Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



यशवंतराव, तर्कतीर्थ आणि बदल



 श्री. यशवंतराव चव्हाण यांनी जयप्रकाशांच्या चळवळीविरुद्ध अगदी ठाम भूमिका घेतलेली आहे. बोर्डी शिबिरात व नुकत्याच झालेल्या सातारा दौऱ्यात त्यांनी जयप्रकाशांशी राजकीय सुसंवाद साधण्याची कल्पना पूर्णपणे धुडकावून लावली व कुठल्याही तडजोडीला स्पष्ट नकार दर्शवला. याविषयी बचावत्मक भूमिका घेऊ नये, जनतेत जाऊन खंबीरपणे आपली बाजू मांडावी, असाही थोडा आक्रमक सल्ला त्यांनी काँग्रेसजनांना या दौऱ्यात दिलेला आहे. चव्हाण बोले आणि काँग्रेस डोले अशी (सध्या) निदान महाराष्ट्रापुरती तरी स्थिती असल्याने हा सल्ला पूर्णपणे मानला जाईल व धारिया वगैरे किरकोळ अपवाद निकालात निघतील यात काही शंका नाही. तरी बरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जयप्रकाश चळवळीबरोबर असा संवाद व्हायला हवा, असे मत नुकतेच प्रकट केलेले आहे. तर्कतीर्थांचे आणि यशवंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुतच आहेत. पण चव्हाणांचे हिशोब वेगळे. तर्कतीर्थांना कुठे दिल्लीचे राजकारण खेळायचे आहे ? आणि चव्हाणांना आजवर फक्त दिल्लीच महत्त्वाची वाटत आलेली आहे. त्यासाठी त्यांनी हव्या त्या तडजोडी आजवर केलेल्या आहेत, नको त्या भूमिका घेतलेल्या आहेत. अर्जुनाला जसा झाडावरील पोपटाचा फक्त डोळाच दिसत होता, तसा चव्हाणांना फक्त सत्तेचा पुढचा गोळाच दिसत आलेला आहे. ज्यांच्या हाती सत्तेची सूत्रे असतील त्यांच्याशी यासाठी कधीही, केव्हाही संघर्षाचा प्रसंग न उद्भवू देण्याचे पथ्य चव्हाणसाहेब कटाक्षाने पाळीत आलेले आहेत व त्याचे फळही आजवर त्यांना मिळत राहिलेले आहे. मग तो जुना संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न असो, की नवा जयप्रकाशांच्या चळवळीचा प्रसंग असो. तत्त्वापेक्षा चव्हाणांनी व्यक्ती मोठी मानली, जनतेपेक्षा, ध्येयधोरणांपेक्षा वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास प्रकट केला. आज इंदिरा गांधी जयप्रकाशांच्या चळवळीला कडाडून विरोध करीत आहेत. चव्हाणसाहेब गप्प राहिले असते तरी चालण्यासारखे होते. तसे त्यांचे स्थान बळकट आहे. पण शंकेला जागा नको म्हणून त्यांनीही र. के. खाडिलकरांप्रमाणे एकदम जयप्रकाश विरोधाचा चढा सूर लावला आणि आपले स्थान अधिकच घट्ट करून घेतले.

निर्माणपर्व । १००