लागली. पंचवीस-तीस लाखांच्या इस्टेटीवर भरावा लागणारा दहा-बारा लाखाचा टॅक्स ऐकूनच माझी छाती दडपली. नवीन नियमांनुसार इस्टेटीवरचा वेल्थ टॅक्ससुद्धा मलाच भरावा लागणार होता म्हणे! फार काळजीपूर्वक गुंतवणूक करायला हवी होती.
बायको नंतर म्हणाली की "बघा हं. कुणाला तरी आणखी विचारुन मग कुठं पैसा गुंतवायचा तो बघा. नाही तर काय म्हणतात ती इन्कमटॅक्सची धाड - बीड आपल्यामागं लागायची."
एकंदरीत श्रीमंती कठीण असते तर!
त्यानंतर दोन दिवसातली गोष्ट.
मी घरात एकटाच होतो. सगळीजणं काही ना काही कारणानं बाहेर गेली होती. डोअर बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात तिघे धटिंगण होते. माझ्या अंगावरुनच ते घरात शिरले आणि सोफ्यावर जाऊन बसले. मी प्रश्नार्थक नजरेने बघत राहिलो.
"सायेब, रहायला येऊन किती दिस झालं?"
"आँ?"
“ह्यो बघा. आम्ही गुंडुदादाची माणसं. इथं आमची खंडणी दि
ल्याशिवाय कुणीच राहू शकत नाही."
“म्हणजे?”
"म्हणजे असं की या बड्या घरातून राहायचं म्हणजे आधी आमच्याम्होरं देवाला ठेवतात तसा ‘नैवेद्य’ ठेवावा लागतो. मग तुम्ही बिनधास्त राहा. कुणी चोर येणार नाही, कुणी तुमची गाडी पळवणार नाही की तुमच्या पोराबाळांच्या अंगाला हात लावणार नाही."
"पऽऽण, पण किती द्यायचे?"
"धंदा काय तुमचा?"
आता मी काहीच करत नाही. अपघातानं काकाचा पैसा मला मिळालाय वगैरे सांगावं का? त्यातलं त्यांना किती पटेल? मग खंडणी किती मागतील ? अशा प्रश्नांच्या संभ्रमात मी पडलो होतो.
तेवढ्यात डोअर-बेल पुन्हा वाजली. मला हायसं वाटलं!
बायको आली होती. घरात बाईमाणूस आलं म्हणून त्या धटिंगणांच्या चेहेऱ्यावर यत्किंचितहि चलबिचल नव्हती. मीच आवरतं घ्यावं म्हणून म्हटलं,