पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 काव्य हा वाङ्‌मय प्रकार ललितवाङ्‌मयाचा मध्यवर्ती वाङ्‌मय प्रकारच नव्हे अशी भूमिका अलीकडे काही टीकाकार घेऊ लागलेले आहेत. इतर ललितकला आणि ललितवाङ्‌मय यांच्या सीमारेषेवरचा हा वाङ्मय प्रकार आहे असे या टीकाकारांना वाटते. त्यांचे म्हणणे बरोबर आहे की चूक आहे हा प्रश्न अगदीच निराळा आहे. पण काही टीकाकारांना असे का वाटावे? याचे कारण काव्य या वाङ्‌मय प्रकाराच्या विलक्षण संवेदनाक्षमतेत शोधावे लागेल. ललितवाङ्‌मय व्यवहारातील इतर वाङ्‌मयप्रकारांत न जाणवणारी तरलता, सूक्ष्मता, आतता या वाङ्‌मय प्रकारात चटकन जाणवते. निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाशी या वाङ्‌मय प्रकारात जवळचा सांधा, नेहमी जाणवतो. ललितवाङ्‌मयात कलावंताचे व्यक्तिमत्त्व उमटून असते काय हा वादग्रस्त प्रश्न आहे. इलियट सारखे टीकाकार Poetry is not an expression of the personality, it is more or less an escape from it. अशा पद्धतीने बोलू लागले आहेत. हा निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाचा मुद्दा काव्य या वाङ्मयप्रकारात अतिशय महत्त्वाचा होऊन बसला आहे. वाङ्मयकृतीत कलावंताचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होते असे म्हटले तरी नाटक वा कादंबरीत ते प्रतिबिंब हुडकण्याचा फारसा प्रयत्न आपण करीत नाही.

 एकच प्याला ही गडकऱ्यांची निर्मिती म्हटली तरी तळीराम व सुधाकर, रामलाल व सिंधू, शरद व भगीरथ अशी अनेक पात्रे डोळ्यांसमोर येतात. यात गडकरी नेमके कोणत्या पात्रात आहेत हे सांगणे फार कठीण असते. काव्यात ही क्रिया त्या मानाने सुलभ असल्याचा भास होतो. मी ज्या पद्धतीने समीक्षेचा विचार करतो त्या पद्धतीने, समीक्षाशास्त्रात, कलाकृतीच्यामागे कलावंतापर्यंत जाण्याचा रस्ताच शिल्लक नसतो, असे मला वाटते. कलाकृती आणि तिचा निर्माता यांच्या संबंधाचे ज्ञान, हे आस्वादान्तर्गत ज्ञान नव्हे; ते आस्वादबाह्य ज्ञान आहे हे आपण बहुधा विसरून जातो. अलीकडे समीक्षेत आत्मनिष्ठा या शब्दाचे महत्त्व भलतेच वाढलेले आहे. कवीने आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहिले पाहिजे असे आपण आग्रहाने सांगतो. पण खरोखरी कवी आपल्या अनुभवाशी प्रामाणिक आहे की नाही हे आपण ठरवणार कसे? कवितेतून व्यक्त होणारा अनुभव रसिक वाचकांना प्रामाणिक वाटतो की नाही हे आपण सांगू शकू. रसिक वाचकांना हा प्रामणिकपणा जाणवणे म्हणजे वाङ्मयाचे चांगलेपण असेही आपण म्हणू शकू. पण खरोखरी हा अनुभव कवीला आला आहे की नाही हे आपण कसे सांगणार? आणि त्याची गरज तरी काय? कलाकृतीतील अभिव्यंजित अनुभवांचा अस्सलपणा वाचकांना जाणवणे इतकेच

कर्पूर / २७