Jump to content

पान:कथाली.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माधवराव नेहमीच उशिराने घरी येत द्वारकाबाईनी कधी नणदेला सोबतीला बोलाविले तर सावित्रा नाक मुरडू उत्तर देई, "छी मला न्हाई तिथे झोपायला आवडत. तुम्हीच या इकडं."
 भामाबाईंनी सावित्राबद्दलची ही कुणकुण सांगितली, त्यानंतर चारच दिवसांनी माधवरावांनी सावित्रासह गावाकडे चालण्याचा तिला हुकूम दिला होता.
 त्याच दिवशीची काळोखी रात्र. गावाकडे आल्या आल्या माधवरावांनी घरातले सर्वगडी शेतावर पाठविले होते. वाड्याची देखभाल करणाऱ्या शंकर यादव आणि त्याच्या बायकोची सकाळीच तुळजापूरला नवस फेडायला रवानगी केली होती. वाड्यात फक्त तीन माणसं. द्वारकाबाई, माधवराव आणि सावित्रा. दादा नका हो मला मारू. अवढ्याबारीला माफी द्या. मी कंदीसुद्धा त्या नामदेवाशी बोलनार न्हाई. शिरसाठवैनींकडं जानार न्हाई. वैनी गऽऽ मला वाचीव. मला भीती वाटते गऽऽ दादा मला नका हो मारू. खोलीत घुमणारा सावित्राचा आवाज दरवाज्याबाहेर ऐकू येत होता.
 हरामखोर साली, वेसवा. घराण्याची अब्रू वेसीवर टांगलीस? माझं नाक तोडतीस? त्या हरामखोर ज्ञानोबानं चारचौघांत मला टोमणा मारला. म्हनला, काय चेअरमनसाहेब, हलक्या जातीशी सोयरपण करून मतांची संख्या पक्की करायचा इचार हाय काय? आन् समदे फिदी फिदी हसले. तुझ्या वैनीला घरात बसून नणदेकडे लक्ष द्याया आलं न्हाई. लई मोकाट सुटली तू. माज्या भविष्याच्या मुळावर येतीस? कुळाचं नाव बुडवतीस? मर, तुला हीच शिक्षा हवी. तुझ्या नावाची अशी चबढब झाल्यावर कोन पतकरनार हाय तुला? बोललीस तर याद राख. हलकट साली...
 आतून बंद असलेल्या दरवाज्याबाहेर द्वारकाबाई थरथरत उभ्या होत्या. सावित्राचा काकावळा आवाज आकान्त करीत होता.
 भोवऱ्यात सापडलेलं लेकरू डोळ्यादेखतां पाण्यात गडप व्हावं नि काठावरची माय जागच्याजागी खिळून राहावी तशी गत.
 सावित्राचा आवाज विझून गेला तशी घामानं लथपथलेले माधवराव बाहेर आले. तुमची धाकटी नणंद पटकी उलटीनं मेलीया. मोठ्यांदा रडा. समदं गाव गोळा करा... रडा म्हनतो ना? हाला इथून!

५६ /कथाली