Jump to content

पान:आमची संस्कृती.pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६६ / आमची संस्कृती
विचार करून पटले म्हणून नव्हे, तर बरेचसे प्रतिष्ठित लोक करतात म्हणून.आमची गुलामाची मनोवृत्ती जशीच्या तशी कायम आहे. पूर्वीचे गुलाम एका मालकामागून जात होते, आम्ही दुसच्या मालकामागून जात आहो. पूर्वीचीच आमिषे निराळ्या नावाने आजही आम्हांला झुलवीत आहेत.

 पक्षभक्तीपुढे सत्यासही हार खावी लागावी?
 आगरकरांची विचारसरणी किती तर्कशुद्ध होती हे त्यांच्या पुढील वाक्यांवरून दिसून येईल. कोणी किती व कसले अन्न खावे, घरात राहावे, कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे, कोणता धंदा करावा, दानधर्म किती करावा, कोणते खेळ खेळावेत, कशा प्रकारचा व्यायाम करावा वगैरे गोष्टींचा लोकांशी म्हणण्यासारखा संबंध नाही. अशा गोष्टींत ज्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. याच्या उलट कोणत्याही मनुष्याशी केलेले करार पाळणे, कोणासही निष्कारण पीडा न देणे, खरे बोलणे, शक्तीनुसार परोपकार करणे, कायदे पाळणे, कर देणे वगैरे गोष्टींत लोकांशी संबंध येतो म्हणून त्या रूढ राजकीय व सामाजिक नियमांस अनुसरून वर्तन करणे जरूर आहे. पण हे नियम ज्याला मान्य नाहीत त्याने काय करावे?... मन:पूतं समाचरेत या मंत्राच्या ख-या अर्थाच्या अनुरोधाने आपले वर्तन चालू द्यावे.'
 ‘सत्यभाषण, प्रामाणिकपणा, व्यवस्थितपणा वगैरे लोकसंमत पण लोकांच्या आचरणात बेताबेतानेच दिसणाच्या गुणांसंबंधाने लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नये. धैर्याने असले गुण आपल्या वर्तनात आणून लोकांत त्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 आगरकरांनी वरवरच्या सुधारणा व त्यांचा आंतरिक पाया ह्याचा खोल विचार केलेला होता. आज आंतरिक पायाच ढासळून पडलेला आहे. तेव्हा समाजाची नवी उभारणी करण्याचे मोठे कार्य आपणावर पडलेले आहे आणि त्यासाठी मन व बुद्धी शुद्ध व खंबीर करण्यासाठी आगरकरांच्या लेखांचे मनन आवश्यक होईल. सत्यभाषणाविषयी एकच उदाहरण घेते. महाराष्ट्रीयांनी मुंबईस हिंसक कृत्ये केली असे विधान मोठया पुढा-यांनी निरनिराळ्या सभांतून पुन:पुन: केले आहे. मुंबईत ल याली त्यात मेलेले लोक हिंसक, का मारणारे हिंसक हा प्रश्न मनापुढे