Jump to content

पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



लोकमताच्या कौलाची दिशा


 पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांमुळे राजकीय जाणकार अचंब्यात पडले आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील लोकमताच्या कौलाचा काही अर्थ एका सूत्रात गोवणे दुरापास्त झाले आहे.
 भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या आणि ज्याचा उमेदवारी अर्ज त्या कारणाने फेटाळण्यात आला त्या तामिळनाडूतील जयललिता यांचा पक्ष विजयी झाला आहे. त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या एवढेच नव्हे तर त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक खाते स्वतःकडे ठेवले आहे. हा लेख प्रकाशित होईपर्यंत, कदाचित्, करूणानिधींविरुद्ध पोलिसी शुक्लकाष्ठ लागलेलेही असेल. केंद्रातील आघाडीचे सरकार एकदा पाडून साऱ्या न्यायालयांचे निर्णय विरोधात जाऊनही जयललिता डगमगल्या नाहीत. विजयश्रीची माळ मतदारांनी त्यांच्या गळ्यात घातली. अलीकडच्या काळातील राजकीय इतिहासात ही एक मोठी पराक्रमगाथाच म्हटली पाहिजे! इंदिरा गांधी सर्वथा पराभूत झाल्या असतानाही लोकांनी त्यांना पुन्हा सत्तेवर आणले, त्याच तोडीचा हा विजय आहे.

 जयललितांच्या या विजयावरून, केंद्रातील शासनास फटकारणाऱ्यांना लोकांनी निवडून दिले असे म्हणावे तर पश्चिम बंगालमधील 'भारतीय राजकारणामधील उगवता तारा' समजल्या जाणाऱ्या ममता दीदींची अगदीच त्रेधातिरपीट झाली. निवडणुकांच्या आधी, दीदी बंगालच्या मुख्यमंत्री होणार असे सर्वांनाच वाटत होते. ऐनवेळी राष्ट्रीय आघाडीचा हात सोडून त्यानी सोनियाबाईंची साथ धरली. त्यांच्या तृणमूल पक्षाची आता शुष्कतृण परिस्थिती झाली आहे. सौराष्ट्रातील भूकंपानंतर, पडलेल्या घरांच्या दगडामातीच्या ढिगाऱ्यात कपाळाला हात लावून 'हे कसे काय घडले' याचा अचंबा करीत बसलेल्या लोकांप्रमाणेच दीदींची परिस्थिती आहे. भरतीओहोटीचा अंदाज घेण्यात त्या चुकल्या हे त्यांनाही

अन्वयार्थ – दोन । २३०