पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भलावण करतात.
 'सोन्याचा पिंजरा, डाळिंबाचे दाणे हा सुखोपभोग पंख पसरून आकाशात भरारी मारण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे, पिंजऱ्याच्या बाहेर पडले तर शिकारी पक्षी जागोजाग टपून बसलेले आहेत, त्यांच्या पुढे टिकाव लागणे शक्य होणार नाही, तस्मात्, हा पिंजराच बरा…' असा हा सारा अपुरुषार्थाचा विचार आहे.
 पण, पिंजराही धड आरामाचा नाही, डाळिंबाचे दाणे सोडा, धड पोटभर खायलाही मिळत नाही आणि बाजूला 'फिरति बहुत बोके द्वाड भारी घरी या' अशी परिस्थिती असेल तर कोणताही शहाणा पक्षी पिंजऱ्याचे दार उघडे राहिले तर सुटका करून घेतो; जी ताकद असेल ती वापरून उड्डाण घेतो; बहिरी ससाण्याचे काय करायचे ते ती वेळ आली म्हणजे पाहून घेऊ असा विचार करतो, त्याच्या भीतीपोटी जन्मभर पिंजऱ्यातील गुलामगिरी स्वीकारीत नाही, पिंजऱ्यातून निघून मालकच खरा आपला हितकर्ता असे मानून, त्याच्या खांद्यावर जाऊन बसत नाही.
 परदेशांतील शेतकऱ्यांना भरपूर अनुदाने मिळतात तशी अनुदाने देणे हिंदुस्थान सरकारला आज शक्यही नाही आणि तशी त्याची इच्छाही नाही. तेव्हा, दुसऱ्यांच्या घरी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या कोडकौतुकाप्रमाणे आपल्याकडेही असे कधी होईल अशी आशा बाळगून बसण्यात काही अर्थ नाही. शेतकऱ्यांची कौतुकं आणि छळ दोन्हीही संपवायची असतील तर त्या ऐतिहासिक कामासाठी WTOची पहाट झाली आहे.
 भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे, मुबलक पाणी आहे कष्टाळू शेतकरी आहे. भारतीय शेतकरी स्पर्धेत कमी पडण्याचे काहीच कारण नाही.
 प्रकाशसिंग बादल यांनी चंडीगड येथील भाषणात एक अनुभव सांगितला. अमेरिकेच्या त्यांच्या भेटीत त्यांनी काही नमुनेदार शेती पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना आदर्श शेतकऱ्यांची यादी दिली गेली, ती जवळजवळ सारीच पंजाबातून आलेल्या शिख अनिवासी भारतीय शेतकऱ्यांची होती. त्यांनी प्रश्न विचारल्यावर खुलासा झाला, की अमेरिकेतील शेतकरी समाजात प्रामुख्याने शेती करणारे शिखच आहेत. भारतातील शेतकरी दुष्टकर्मा सरकारऐवजी थोडेफार लालनपालन करणाऱ्या सरकारच्या अमलाखाली काय चमत्कार करून दाखवितो याचे हे उदाहरण आहे.

 स्पर्धेत उतरायचे आहे, जिंकलो तर उत्तमच, पण नाही जिंकलो तरी निदान सरकारी जुलुमाच्या पिंजऱ्यातून मुक्तता झाल्याचा आनंद काही थोडका नाही.

अन्वयार्थ - दोन / १२८