Jump to content

पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/251

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भारताचा रशिया करू पाहाणाऱ्यांना रोखा


 खाद्या बड्या घरचे दिवाळे निघाले म्हणजे रोजचा पोटापाण्याचा खर्च चालविण्यासाठीसुद्धा, वैभवाच्या काळात पूर्वजांनी जमा केलेल्या मौल्यवान चिजा बाजारात नेऊन विकाव्या लागतात. जडजवाहीर, जमीनजुमला, भार गालिचे, चित्रे, एवढेच नव्हे तर पुरातनत्वामुळे केवळ अमोल असणारे सामान एकएक करत काढले जाते. मोठ्या घरच्या वस्तू असल्यामुळे उघडउघड बाजारात त्या ठेवता येत नाहीत, मग घरच्या दिवाणजीमार्फत पदराआड लपवून त्या बाहेर पाठविल्या जातात. पुष्कळदा दिवाणजी आणि नोकरदार स्वत:च्या खात्यावर मालकांच्या मौल्यवान वस्तू बाजारात खपवतात.
 सा रम्या नगरी
 पूर्वाश्रमीच्या सोविएत संघाची स्थिती आज अशीच आहे. जुने सारे वैभव रसातळाला गेले. ती रम्य नगरे; ज्यांचे नाव ऐकताच थरकाप उडे असे हुकूमशहा; ती मांडलिक राष्ट्रांची प्रभावळ, आता सारे संपले आहे. डॉलरच्या बरोबरीने मिरवणारा रुबल १५ दिवसांपूर्वी ५ पैशाच्या बरोबरीचासुद्धा राहिला नव्हता. शासनाचा सूटसबसिड्यांचा कार्यक्रम चालूच आहे. त्यासाठी चलनी नोटा छापण्यावर थोडेफार तरी बंधन राहिले आहे, ते नोटा छापण्यासाठी लागणाऱ्या कागदाच्या तुटवड्यामुळे.

 खाद्यपदार्थांचे दुर्भिक्ष चालूच आहे; पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. आंघोळीच्या घंघाळात साठवून ठेवलेले पाणी पुन्हा पुन्हा वापरून गृहिणींना गुजराण करावी लागत आहे. समाजवादी महासत्तेची आजची ही परिस्थिती अटळ होती, अपरिहार्य होती हे जाणणाऱ्यांच्या सुद्धा 'कालाय तस्मै नमः' असे मनात येऊन डोळ्यांत पाणी उभे राहते.

अन्वयार्थ - एक / २५२