Jump to content

पान:अंगारमळा (Angarmala).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साहित्यिक मांडू शकला नाहीत तर तुमची अनुभूती किती खरी याबद्दल मला शंका आहे. तुमची अनुभूती जर इंग्रजी भाषेचं बोट धरून आलेली अनुभूती असेल तर तुमची मराठी भाषा का जगावी?

 तुमची, तुमच्या भागातली आयुष्यं अनुभवसंपन्न होण्याकरिता काही अमेरिका तयार करावी लागत नाही. जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यातले विविधतेचे अनुभव तुम्ही किती घेता हे खरे महत्त्वाचे आहे. इथे आम्ही कमी पडतो म्हणून साहित्याला हे 'ब्राह्मणी' स्वरूप येतं आहे. ज्ञानेश्वरांनी 'फाटलेल्या कांबळी'च्या जागी आता 'नवी कांबळ' मागावी हे ठीक आहे; पण तीच मागणी जर का १९९५ सालचा कवी करू लागला तर त्याचा अर्थ आपलं नपुंसकत्व, आपला भ्याडपणा, आपला भीरूपणा तो देवाच्या मागे लपवायचा प्रयत्न करतो आहे. जे जे सत्य आहे ते कवीनं सांगायला काय हरकत आहे? का सांगितलं गेलं नाही? कारण आम्ही आमची अनुभूतीची सगळी क्षेत्रं लहान करीत चाललो आहोत.

 महाराष्ट्रातले साहित्यिक कोण? टीकाकार हे सगळे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, त्यात तीन चतुर्थांश कुलकर्णी आडनावाचे! लेखन कोण करतं? कविता कोण करतं? जे कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवतात ते मराठी लिखाण करतात; अपवादानेच, इतर विषय शिकविणारेही मराठी लिखाण करतात. म्हणजे साधारणत: कॉलेजातील माणसं लिखाण करतात. आता, कॉलेजचं विश्व ते काय? मग त्यांनी लिहिलेलं, 'तिनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं तिच्याकडं पाहिलं; बापानं थोडा विरोध केला, शेवटी जमलं." असं तेच तेच लिखाण पुन्हा पुन्हा वाचावं लागलं तर तुमचं साहित्य जिवंत आहे असं म्हणताच कशाला? ते मेलंच आहे.

 सॉमरसेट मॉम हा माझा फार आवडता लेखक आहे आणि मला असं वाटतं, की . कुणीही लिहू इच्छिणाऱ्याने मॉमच्या निदान चार लघुकथा Short stories वाचल्याखेरीज लिहूच नये. या माणसाने आयुष्यभर फक्त प्रवास केला. पॅसिफिकमधील एकेक बेट तो हिंडला. त्यातून घेतलेल्या विलक्षण अनुभवाला त्यानं साहित्यात आणलं. त्याचं साहित्य वाचलं, की प्रत्येक वेळी मला वाटतं, की आता अनुभवाच्या दृष्टीनं आपण सॉमरसेट मॉमइतकंच प्रगल्भ झालो आहो. आता त्या साहित्यात आपल्याला धक्का देण्याची ताकद राहिली नाही; पण ती पुस्तकं पुन्हा वाचायला लागलो, की आधीच्या अनुभवापेक्षा वेगळाच अनुभव येऊन अचंबित होतो. मग लक्षात येतं, की त्याच्या मानानं अजून आम्ही लहान बालकं आहोत किंवा अपंग आहोत.

  मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल.मोठी व्हायची असेल तर, शिक्षणाची व्यवस्था

अंगारमळा । १४०