Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


तंत्रज्ञानाचे अग्निदिव्य


 ११ मे २००१ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे 'तंत्रज्ञान दिवस' साजरा व्हायचे ठरले होते. प्रत्यक्षात कोठे एखादा किरकोळ सभासमारंभ झाला असेल. माझ्या तो नजरेत आला नाही; इतर कोणाच्याही आला नसावा. त्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रात भली पानभर जाहिरात मात्र नजरेत भरली. एक पानी जाहिरात म्हणजे कित्येक लाखांचा खर्च: पण कोणत्याही केंद्रीय मंत्रालयाला असल्या खर्चाची फारशी फिकीर वाटत नाही. नागरिकांत उत्साह असल्याखेरीज कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नाहीत; जाहिरात दिल्याने खुर्चीत बसल्या बसल्या प्रसिद्धीचे काम होऊन जाते.

 जाहिरातीच्या अग्रभागी उपराष्ट्रपती व स्वतः पंतप्रधान यांचे फोटो आणि त्यांच्या बरोबरच मानवसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी आणि शेवटी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री बाची सिंग रावत यांचे फोटो आणि संदेश.

 झपाट्याने एक होणाऱ्या जगात तंत्रज्ञानातील सामर्थ्य जोपासायचे असेल तर आपल्या नीतिमूल्यांची सातत्याने तपासणी करावी लागेल. - कृष्णकांत, उपराष्ट्रपती

 नवीन शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, समाज, शासन आणि पर्यावरण यांचा संगम महत्त्वाचा ठरणार आहे. - अटलबिहारी वाजपेयी, प्रधानमंत्री

 भविष्यातील ज्ञान हे सामाजिक गरजांशी निगडित असले पाहिजे. त्यात माणुसकीची जोपासना पाहिजे आणि त्यातून टिकाऊ तंत्रज्ञान उपजले पाहिजे. - मुरली मनोहर जोशी, मानसंसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान व सागरी विकास मंत्री

 आज सतत विकसनशील, प्रसरणशील आणि परिवर्तनशील अशा विविध व संयुक्तिक तंत्रज्ञानांची जोपासना ही आत्यंतिक गरज आहे. - बाची सिंग रावत,

भारतासाठी । २३६