श्रीमद्‌भगवद्‌गीता : दुसरा अध्याय (सांख्ययोग)

विकिस्रोत कडून

मूळ दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ

   अथ द्वितीयोऽध्यायः

अर्थ

दुसरा अध्याय सुरु होतो.

मूळ श्लोक

   सञ्जय उवाच
   तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
   विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम्‌ = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम्‌ = शोकयुक्त (अशा), तम्‌ = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१ ॥

अर्थ

संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥

मूळ श्लोक

   श्रीभगवानुवाच
   कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
   अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम्‌ = हा, कश्मलम्‌ = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम्‌ = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम्‌ = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम्‌ = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम्‌ = कीर्ति देणारा पण नव्हे ॥ २-२ ॥

अर्थ

श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥

मूळ श्लोक

   क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
   क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक ॥ २-३ ॥

अर्थ

म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥

मूळ श्लोक

   अर्जुन उवाच
   कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
   इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना, सङ्ख्ये = रणभूमीवर, भीष्मम्‌ = भीष्म, = व, द्रोणम्‌ = द्रोण यांचेबरोबर, अहम्‌ = मी, इषुभिः = बाणांनी, कथम्‌ = कसा बरे, प्रतियोत्स्यामि = (त्यांच्या) विरुद्ध लढू, (यतः) = कारण, अरिसूदन = हे अरिसूदना, (तौ) = ते दोघेही, पूजार्हौ = पूजनीय (आहेत) ॥ २-४ ॥

अर्थ

अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. ॥ २-४ ॥

मूळ श्लोक

   गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
   हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ २-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

महानुभावान्‌ = महानुभाव, गुरून्‌ = गुरुजनांना, अहत्वा = न मारता, इह लोके = या जगात, भैक्ष्यम्‌ = भिक्षेचे अन्न, अपि = सुद्धा, भोक्तुम्‌ = खाणे (हे), श्रेयः = कल्याणकारक (आहे असे मला वाटते), हि = कारण, गुरून्‌ = गुरुजनांना, हत्वा = मारून, (अपि) = सुद्धा, इह = या जगात, रुधिरप्रदिग्धान्‌ = रक्ताने माखलेले, अर्थकामान्‌ = अर्थ व कामरूप, भोगान्‌ एव = भोगच, तु = तर, भुञ्जीय = मी भोगेन ॥ २-५ ॥

अर्थ

म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥

मूळ श्लोक

   न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
   यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एतत्‌ = हे, (च) = सुद्धा, न विद्मः = आम्हाला कळत नाही, यत्‌ = की, कतरत्‌ = (युद्ध करणे वा न करणे यातील) कोणते, नः = आम्हाला, गरीयः = श्रेष्ठ आहे, वा = तसेच, जयेम = आम्ही विजयी होऊ, यदि वा = अथवा, (ते) = ते, नः = आम्हाला, जयेयुः = जिंकतील, यान्‌ = ज्यांना, हत्वा = मारून, न जिजीविषामः = आम्ही जगू इच्छित नाही, ते = ते(हे आत्मीय असणारे), धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, एव = च, प्रमुखे = आमच्या पुढे युद्धाला, अवस्थिताः = उभे आहेत ॥ २-६ ॥

अर्थ

युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥

मूळ श्लोक

   कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
   यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कार्पण्यदोषोपहतस्वभावः = कारुण्यरूपी कातरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे, (च) = आणि, धर्मसम्मूढचेताः = धर्माच्या बाबतीत ज्याचे चित्त मोहित झाले आहे असा मी, त्वाम्‌ = तुम्हाला, पृच्छामि = विचारतो, यत्‌ = जे(साधन), निश्चितम्‌ = निश्चितपणाने, श्रेयः = कल्याणकारक, स्यात्‌ = असेल, तत्‌ = ते, मे = मला, ब्रूहि = (तुम्ही) सांगा, (यत्‌) = कारण, अहम्‌ = मी, ते = तुमचा, शिष्यः = शिष्य (आहे), (अतः) = म्हणून, त्वाम्‌ = तुम्हाला, प्रपन्नम्‌ = शरण आलेल्या (अशा), माम्‌ = मला, शाधि = उपदेश करा ॥ २-७ ॥

अर्थ

करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥

मूळ श्लोक

   न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ ।
   अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, भूमौ = भूमंडळाचे, असपत्‍नम्‌ = निष्कंटक, ऋद्धम्‌ = धनधान्यसंपन्न, राज्यम्‌ = राज्य, = तसेच, सुराणाम्‌ = देवांचे, आधिपत्यम्‌ = स्वामित्व, अवाप्य = मिळून, अपि = सुद्धा, (यत्‌) = जो (उपाय), मम = माझ्या, इन्द्रियाणाम्‌ = इंद्रियांना, उच्छोषणम्‌ = सुकवून टाकणारा, शोकम्‌ = शोक, अपनुद्यात्‌ = दूर करू शकेल, (तत्‌) = असा उपाय, न प्रपश्यामि = मला दिसत नाही ॥ २-८ ॥

अर्थ

कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥

मूळ श्लोक

   सञ्जय उवाच
   एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
   न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, गुडाकेशः = निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने, हृषीकेशम्‌ = अंतर्यामी श्रीकृष्णांना, एवम्‌ = असे, उक्त्वा = सांगून, न योत्स्ये = मी युद्ध करणार नाही, इति = असे, = स्पष्टपणे, गोविन्दम्‌ = गोविंदाला, उक्त्वा = म्हणून (मग तो), तूष्णीम्‌ = गप्प, बभूव = झाला ॥ २-९ ॥

अर्थ

संजय म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥ २-९ ॥

मूळ श्लोक

   तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
   सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भरतवंशी धृतराष्ट्रा, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, विषीदन्तम्‌ = शोक करणाऱ्या, तम्‌ = त्या (अर्जुनाला), हृषीकेशः = अंतर्यामी श्रीकृष्ण, प्रहसन्‌ इव = जणू स्मित करून, इदम्‌ = हे, वचः = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१० ॥

अर्थ

हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले ॥ २-१० ॥

मूळ श्लोक

   श्रीभगवानुवाच
   अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
   गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, (अर्जुन) = हे अर्जुना, अशोच्यान्‌ = शोक करण्यास योग्य नसणाऱ्या माणसांसाठी, त्वम्‌ = तू, अन्वशोचः = शोक करीत आहेस, = आणि, प्रज्ञावादान्‌ = पंडितांच्याप्रमाणे वचने, भाषसे = बोलत आहेस, (परन्तु) = परंतु, गतासून्‌ = ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, = आणि, अगतासून्‌ = ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी (सुद्धा), पण्डिताः = पंडित लोक, न अनुशोचन्ति = शोक करत नाहीत ॥ २-११ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥ २-११ ॥

मूळ श्लोक

   न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
   न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्‌ ॥ २-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

जातु = कोणत्याही काळी, अहम्‌ = मी, न आसम्‌ = नव्हतो, त्वम्‌ = तू, न (आसीः) = नव्हतास, (अथवा) = अथवा, इमे = हे, जनाधिपाः = राजेलोक, न (आसन्‌) = नव्हते, (इति) = असे, तु = तर, न एव = मुळीच नाही, = तसेच, अतः परम्‌ = यापुढे, वयम्‌ = आपण, सर्वे = सर्वजण, न भविष्यामः = असणार नाही, (एवम्‌) न एव = असेही नाही ॥ २-१२ ॥

अर्थ

मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥ २-१२ ॥

मूळ श्लोक

   देहिनोऽस्मिन्‌ यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
   तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यथा = ज्याप्रमाणे, देहिनः = जीवात्म्याला, अस्मिन्‌ देहे = या देहात, कौमारम्‌ = बालपण, यौवनम्‌ = तारुण्य, (च) = आणि, जरा = वार्धक्य (येते), तथा = त्याप्रमाणे, देहान्तरप्राप्तिः = दुसरे शरीर मिळते, तत्र = त्या बाबतीत, धीरः = धीर माणूस, न मुह्यति = मोहित होत नाही ॥ २-१३ ॥

अर्थ

ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. ॥ २-१३ ॥

मूळ श्लोक

   मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
   आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कुंतीपुत्रा, शीतोष्णसुखदुःखदाः = थंडी-उष्णता, व सुख-दुःख देणारे, मात्रास्पर्शाः = इंद्रिये आणि विषयांचे संयोग, तु = तर, आगमापायिनः = उत्पत्ति-विनाश-शील, (च) = आणि, अनित्याः = अनित्य (आहेत), (अतः) = म्हणून, भारत = हे भारता, तान्‌ = त्यांना, तितिक्षस्व = तू सहन कर ॥ २-१४ ॥

अर्थ

हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. ॥ २-१४ ॥

मूळ श्लोक

   यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
   समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, पुरुषर्षभ = हे पुरुषश्रेष्ठा, समदुःखसुखम्‌ = सुखदुःखाला समान मानणाऱ्या, यम्‌ = ज्या, धीरम्‌ = धीर, पुरुषम्‌ = पुरुषाला, एते = हे (इंद्रियांचे विषयांशी संयोग), न व्यथयन्ति = व्याकुळ करीत नाहीत, सः = तो (पुरुष), अमृतत्वाय = मोक्षाला, कल्पते = योग्य ठरतो ॥ २-१५ ॥

अर्थ

कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. ॥ २-१५ ॥

मूळ श्लोक

   नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
   उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

असतः = असत्‌ वस्तूला, भावः = अस्तित्व, न विद्यते = नसते, तु = आणि, सतः = सत्‌ वस्तूचा, अभावः = अभाव, न विद्यते = असत नाही, (एवम्‌) = अशाप्रकारे, अनायोः उभोयोः अपि = या दोहोंचेही, अन्तः = तत्त्व, तत्त्वदर्शिभिः = तत्त्वज्ञानी पुरुषांनी, दृष्टः = पाहिलेले आहे ॥ २-१६ ॥

अर्थ

असत्‌ वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ॥ २-१६ ॥

मूळ श्लोक

   अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्‌ ।
   विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

येन = ज्याने, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = संपूर्ण जगत (दृश्य वर्ग), ततम्‌ = व्यापून टाकले आहे, तत्‌ = ते, तु = तर, अविनाशि = अविनाशी, (अस्ति) = आहे, (इति) = असे, विद्धि = तू जाण, अस्य = या, अव्ययस्य = अविनाशीचा, विनाशम्‌ = विनाश, कर्तुम्‌ = करण्यास, कश्चित्‌ = कोणीही, न अर्हति = समर्थ नाही ॥ २-१७ ॥

अर्थ

ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. ॥ २-१७ ॥

मूळ श्लोक

   अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
   अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ २-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अस्य = या, अनाशिनः = नाशरहित, अप्रमेयस्य = अप्रमेय, नित्यस्य = नित्यस्वरूप (अशा), शरीरिणः = जीवात्म्यांचे, इमे = हे, देहाः = (सर्व) देह, अन्तवन्तः = नाशवंत आहेत, उक्ताः = (असे) म्हटले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, युध्यस्व = तू युद्ध कर ॥ २-१८ ॥

अर्थ

या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. ॥ २-१८ ॥

मूळ श्लोक

   य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्‌ ।
   उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एनम्‌ = हा, (आत्मानम्‌) = आत्मा, हन्तारम्‌ = मारणारा (आहे), (इति) = असे, यः = जो (कोणी), वेत्ति = समजतो, = तसेच, एनम्‌ = हा, हतम्‌ = मेला (असे), यः = जो (कोणी), मन्यते = मानतो, तौ = ते, उभौ = दोघे, न विजानीतः = जाणत नाहीत, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा) (वस्तुतः), न हन्ति = (कोणालाही) मारत नाही, = तसेच, न हन्यते = मारलाही जात नाही ॥ २-१९ ॥

अर्थ

जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा (आत्मा) मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. ॥ २-१९ ॥

मूळ श्लोक

   न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
   अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

अयम्‌ = हा (आत्मा), कदाचित्‌ = कोणत्याही काळी, न जायते = जन्मत नाही, वा = तसेच, न म्रियते = मरतही नाही, वा = तसेच (हा), भूत्वा = उत्पन्न होऊन, भूयः = पुन्हा, न भविता = उत्पन्न होणार नाही, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा), अजः = अजन्मा, नित्यः = नित्य, शाश्वतः = सनातन, पुराणः = पुरातन (आहे), शरीरे = शरीर, हन्यमाने = मारले गेलेले असतानाही, (अयम्‌) = हा (आत्मा), न हन्यते = मारला जात नाही ॥ २-२० ॥

अर्थ

हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. ॥ २-२० ॥

मूळ श्लोक

   वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्‌ ।
   कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्‌ ॥ २-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एनम्‌ = हा (आत्मा), अविनाशम्‌ = नाशरहित, नित्यम्‌ = नित्य, अजम्‌ = अजन्मा, (च) = आणि, अव्ययम्‌ = अव्यय (आहे असे), यः = जो कोणी, पुरुषः = पुरुष, वेद = जाणतो, सः = तो (पुरुष), कम्‌ = कोणाला, कथम्‌ = कसा बरे, घातयति = ठार करवील, (तथा) = तसेच, कम्‌ = कोणाला, (कथम्‌) = कसा बरे, हन्ति = मारील ॥ २-२१ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे, हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील? ॥ २-२१ ॥

मूळ श्लोक

   वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
   तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यथा = ज्याप्रमाणे, नरः = माणूस, जीर्णानि = जुनी, वासांसि = वस्त्रे, विहाय = टाकून देऊन, अपराणि = दुसरी, नवानि = नवी (वस्त्रे), गृह्णाति = घेतो, तथा = त्याप्रमाणेच, देही = देहात निवास करणारा जीवात्मा, जीर्णानि = जुनी, शरीराणि = शरीरे, विहाय = टाकून देऊन, अन्यानि = दुसऱ्या, नवानि = नवीन शरीरात, संयाति = जातो ॥ २-२२ ॥

अर्थ

ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. ॥ २-२२ ॥

मूळ श्लोक

   नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
   न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एनम्‌ = या(आत्म्या)ला, शस्त्राणि = शस्त्रे, न छिन्दन्ति = कापू शकत नाहीत, एनम्‌ = या(आत्म्या)ला, पावकः = अग्नी, न दहति = जाळू शकत नाही, एनम्‌ = या(आत्म्या)ला, आपः = पाणी, न क्लेदयन्ति = भिजवू शकत नाही, = तसेच, (एनम्‌) = या आत्म्याला, मारुतः = वारा, न शोषयति = वाळवू शकत नाही ॥ २-२३ ॥

अर्थ

या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥ २-२३ ॥

मूळ श्लोक

   अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
   नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(यतः) = कारण, अयम्‌ = हा आत्मा, अच्छेद्यः = अच्छेद्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, अदाह्यः = अदाह्य, अक्लेद्यः = अक्लेद्य, = आणि, एव = निःसंदेहपणे, अशोष्यः = अशोष्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, नित्यः = नित्य, सर्वगतः = सर्वव्यापी, अचलः = अचल, स्थाणुः = स्थिर राहाणारा, (च) = आणि, सनातनः = सनातन, (अस्ति) = आहे ॥ २-२४ ॥

अर्थ

कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहाणारा आणि सनातन आहे. ॥ २-२४ ॥

मूळ श्लोक

   अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
   तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अयम्‌ = हा (आत्मा), अव्यक्तः = अव्यक्त (आहे), अयम्‌ = हा (आत्मा), अचिन्त्यः = अचिंत्य (आहे), (च) = तसेच, अयम्‌ = हा (आत्मा), अविकार्यः = विकाररहित (आहे असे), उच्यते = म्हटले जाते, तस्मात्‌ = म्हणून, एनम्‌ = या(आत्म्या)ला, एवम्‌ = अशा वरील प्रकारे, विदित्वा = जाणून, अनुशोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणे उचित नाही ॥ २-२५ ॥

अर्थ

हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२५ ॥

मूळ श्लोक

   अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।
   तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अथ = परंतु, = जर, एनम्‌ = हा (आत्मा), नित्यजातम्‌ = नेहमी जन्माला येणारा, वा = तसेच, नित्यम्‌ = सदा, मृतम्‌ = मरणारा (आहे असे), त्वम्‌ = तू, मन्यसे = मानत असशील, तथापि = तरीसुद्धा, महाबाहो = हे महाबाहो, एवम्‌ = अशा प्रकारे, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस ॥ २-२६ ॥

अर्थ

परंतु, जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ॥ २-२६ ॥

मूळ श्लोक

   जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
   तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण (वरीलप्रमाणे मानल्यास), जातस्य = जन्मास आलेल्याला, मृत्युः = मृत्यू, ध्रुवः = निश्चित (आहे), = तसेच, मृतस्य = मेलेल्याला, जन्म = जन्म, ध्रुवम्‌ = निश्चित आहे, तस्मात्‌ = म्हणूनही, अपरिहार्ये = उपाय नसलेल्या, अर्थे = त्या गोष्टीच्या बाबतीत, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस ॥ २-२७ ॥

अर्थ

कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२७ ॥

मूळ श्लोक

   अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
   अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भरतवंशी अर्जुना, भूतानि = सर्व प्राणी, अव्यक्तादीनि = जन्मापूर्वी अप्रकट (होते), (च) = आणि, अव्यक्तनिधनानि एव = मेल्यानंतरही अप्रकट होणारे (असतात), (केवलम्‌) = केवळ, व्यक्तमध्यानि = मध्ये प्रकट आहेत, (अथ) = मग, तत्र = अशा स्थितीत, का = काय, परिदेवना = शोक (करायचा आहे) ॥ २-२८ ॥

अर्थ

हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. ॥ २-२८ ॥

मूळ श्लोक

   आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
   आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥ २-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कश्चित्‌ = कोणी विरळ महापुरुषच, एनम्‌ = ह्या आत्म्याला, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, पश्यति = पाहातो, = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, अन्यः = दुसरा एखादा महापुरुषच, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, (एनम्‌) = याचे, वदति = वर्णन करतो, = तसेच, अन्यः = दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम्‌ = याच्याविषयी, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, शृणोति = ऐकतो, = आणि, कश्चित्‌ = कोणी कोणी तर, श्रुत्वा = ऐकून, अपि = सुद्धा, एनम्‌ = याला, न एव वेद = जाणतच नाही ॥ २-२९ ॥

अर्थ

एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहातो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥ २-२९ ॥

मूळ श्लोक

   देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
   तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भरतवंशी अर्जुना, सर्वस्य = सर्वांच्या, देहे = देहांमध्ये, अयम्‌ = हा, देही = आत्मा, नित्यम्‌ = नेहमीच, अवध्यः = अवध्य आहे, तस्मात्‌ = म्हणून, सर्वाणि = सर्व, भूतानि = प्राण्यांच्यासाठी, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस ॥ २-३० ॥

अर्थ

हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-३० ॥

मूळ श्लोक

   स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
   धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= तसेच, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, अवेक्ष्य = लक्षात घेऊन, अपि = सुद्धा, विकम्पितुम्‌ = भय बाळगण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, हि = कारण, क्षत्रियस्य = क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात्‌ = धर्मयुक्त, युद्धात्‌ = युद्धापेक्षा (वरचढ), अन्यत्‌ = दुसरे कोणतेही, श्रेयः = कल्याणकारी कर्तव्य, न विद्यते = नसते ॥ २-३१ ॥

अर्थ

तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥ २-३१ ॥

मूळ श्लोक

   यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ ।
   सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ २-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदृच्छया = आपोआप, उपपन्नम्‌ = प्राप्त झालेले, = आणि, अपावृतम्‌ स्वर्गद्वारम्‌ = उघडलेले स्वर्गाचे द्वार असे, ईदृशम्‌ = अशाप्रकारचे, युद्धम्‌ = युद्ध, सुखिनः = भाग्यवान, क्षत्रियाः = क्षत्रिय लोकांनाच, लभन्ते = प्राप्त होते ॥ २-३२ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. ॥ २-३२ ॥

मूळ श्लोक

   अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
   ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अथ = परंतु, चेत्‌ = जर, त्वम्‌ = तू, इमम्‌ = हे, धर्म्यम्‌ = धर्मयुक्त, सङ्ग्रामम्‌ = युद्ध, न करिष्यसि = न करशील, ततः = तर मग, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, = आणि, कीर्तिम्‌ = कीर्ती (यांना), हित्वा = गमावून, पापम्‌ = पाप, अवाप्स्यसि = तू प्राप्त करून घेशील ॥ २-३३ ॥

अर्थ

परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥ २-३३ ॥

मूळ श्लोक

   अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ ।
   सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= तसेच, भूतानि = सर्व लोक, अव्ययाम्‌ = पुष्कळ काळ टिकणारी, ते = तुझी, अकीर्तिम्‌ = अपकीर्ती, अपि = सुद्धा, कथयिष्यन्ति = सांगत सुटतील, = आणि, सम्भावितस्य = माननीय पुरुषांसाठी, अकीर्तिः = अपकीर्ति (ही), मरणात्‌ = मरणापेक्षा, अतिरिच्यते = अधिक दुःसह असते ॥ २-३४ ॥

अर्थ

तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ति सांगत राहातील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःसह वाटते. ॥ २-३४ ॥

मूळ श्लोक

   भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
   येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ २-३५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= आणि, येषाम्‌ = ज्यांच्या (दृष्टीने), त्वम्‌ = तू (पूर्वी), बहुमतः = अतिशय माननीय, भूत्वा = होऊन, (इदानीम्‌) = आता, लाघवम्‌ = क्षुद्रतेप्रत, यास्यसि = जाशील, (ते) = ते, महारथाः = महारथी लोक, त्वाम्‌ = तू, भयात्‌ = भीतीमुळे, रणात्‌ = युद्धातून, उपरतम्‌ = मागे फिरलास, (इति) = असे, मंस्यन्ते = मानतील ॥ २-३५ ॥

अर्थ

शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिऊन युद्धातून काढता पाय घेतला, असे मानतील. ॥ २-३५ ॥

मूळ श्लोक

   अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
   निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ २-३६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तव = तुझे, अहिताः = वैरी लोक, तव = तुझ्या, सामर्थ्यम्‌ = सामर्थ्याची, निन्दन्तः = निंदा करीत, बहून्‌ = पुष्कळ, अवाच्यवादान्‌ = सांगण्यासारखी नसणारी वचने, = सुद्धा, वदिष्यन्ति = बोलतील, ततः = त्यापेक्षा, दुःखतरम्‌ = अधिक दुःखदायक, नु किम्‌ = आणखी काय असेल (बरे) ॥ २-३६ ॥

अर्थ

तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? ॥ २-३६ ॥

मूळ श्लोक

   हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ ।
   तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ २-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

वा = अथवा, (त्वम्‌) = तू, हतः = (युद्धात) मारला जाऊन, स्वर्गम्‌ = स्वर्ग, प्राप्स्यसि = प्राप्त करून घेशील, वा = अथवा, (युद्धे) = युद्धात, जित्वा = जिंकून, महीम्‌ = पृथ्वीचे राज्य, भोक्ष्यसे = तू भोगशील, तस्मात्‌ = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, युद्धाय = युद्ध करण्याचा, कृतनिश्चयः = निश्चय करून, उत्तिष्ठ = उठून उभा राहा ॥ २-३७ ॥

अर्थ

युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. ॥ २-३७ ॥

मूळ श्लोक

   सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
   ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

जयाजयौ = जय व पराजय, लाभालाभौ = लाभ-हानि, (च) = आणि, सुखदुःखे = सुख व दुःख (यांना), समे = समान, कृत्वा = मानून, ततः = त्यानंतर, युद्धाय = युद्ध करण्यासाठी, युज्यस्व = तयार हो, एवम्‌ = अशाप्रकारे (युद्ध केल्यामुळे), पापम्‌ = पाप, न अवाप्स्यसि = तुला लागणार नाही ॥ २-३८ ॥

अर्थ

जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. ॥ २-३८ ॥

मूळ श्लोक

   एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
   बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा = ही, बुद्धिः = बुद्धी, (मया) = मी, ते = तुझ्यासाठी, साङ्ख्ये = ज्ञानयोगाच्या बाबतीत, अभिहिता = सांगितली, तु = आणि (आता), योगे = कर्मयोगाच्या बाबतीतील, इमाम्‌ = ही (बुद्धी), शृणु = तु ऐक, यया = ज्या, बुद्ध्या = बुद्धीने, युक्तः = युक्त झालेला (असा तू), कर्मबन्धनम्‌ = कर्मांच्या बंधनाला, प्रहास्यसि = चांगल्या प्रकारे टाकशील म्हणजे तू कर्मबंधनाला पूर्णपणे नष्ट करून टाकशील ॥ २-३९ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥ २-३९ ॥

मूळ श्लोक

   नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
   स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ २-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ

इह = या कर्मयोगामध्ये, अभिक्रमनाशः = आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश, न अस्ति = होत नाही, (च) = (तसेच), प्रत्यवायः = विपर्यस्त फलरूपी दोष (सुद्धा), न विद्यते = असत नाहीत, अस्य = या कर्मयोगरूपी, धर्मस्य = धर्माचे, स्वल्पम्‌ = थोडे (साधन), अपि = सुद्धा, महतः = महान, भयात्‌ = (जन्ममृत्युरूपी) भयापासून, त्रायते = रक्षण करते ॥ २-४० ॥

अर्थ

या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥ २-४० ॥

मूळ श्लोक

   व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
   बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ २-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कुरुनन्दन = हे कुरुवंशी अर्जुना, इह = या कर्मयोगामध्ये, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी, एका = एकच, (भवति) = आहे, (परन्तु) = परंतु, अव्यवसायिनाम्‌ = अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या, बुद्धयः = बुद्धी, हि = निश्चितपणे, बहुशाखाः = पुष्कळ भेद असणाऱ्या, = आणि, अनन्ताः = अनंत, (सन्ति) = असतात ॥ २-४१ ॥

अर्थ

हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते. परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. ॥ २-४१ ॥

मूळ श्लोक

   यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
   वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
   कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ ।
   क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
   भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ ।
   व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), कामात्मानः = जे भोगात तन्मय झालेले असतात, वेदवादरताः = कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदवाक्यांमध्ये ज्यांची प्रीती आहे, स्वर्गपराः = ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परम प्राप्य वस्तू वाटते, (च) = आणि, (स्वर्गात्‌ अधिकम्‌) = स्वर्गापेक्षा अधिक, अन्यत्‌ = दुसरी (कोणतीही वस्तूच), न अस्ति = नाही, इति = असे, वादिनः = जे म्हणतात, (ते) = ते, अविपश्चितः = अविवेकी लोक, इमाम्‌ = अशाप्रकारची, याम्‌ = जी, पुष्पिताम्‌ = पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त, वाचम्‌ = वाणी, प्रवदन्ति = उच्चारतात, (यां वाचम्‌) = जी वाणी, जन्मकर्मफलप्रदाम्‌ = जन्मरूपी कर्मफळ देणारी, भोगैश्वर्यगतिं प्रति = भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी, क्रियाविशेषबहुलाम्‌ = पुष्कळशा क्रियांचे वर्णन करणारी आहे, तया = त्या वाणीमुळे, अपहृतचेतसाम्‌ = ज्यांची मने हरण केली गेली आहेत, भोगैश्वर्यप्रसक्तानाम्‌ = जे भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये अत्यंत आसक्त आहेत, (तेषां पुरुषाणाम्‌) = त्या पुरुषांची, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी (ही), न विधीयते = स्थिर असत नाही ॥ २-४२, २-४३, २-४४ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. ॥ २-४२, २-४३, २-४४ ॥

मूळ श्लोक

   त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
   निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ २-४५ ॥ 

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, वेदाः = वेद (हे वरीलप्रकाराने), त्रैगुण्यविषयाः = तीन गुणांचे कार्यरूप असे भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत, (अतः) = म्हणून, निस्त्रैगुण्यः = ते भोग व त्यांची साधने यांमध्ये आसक्तिरहित, निर्द्वन्द्वः = हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांनी रहित, नित्यसत्त्वस्थः = नित्यवस्तू अशा परमात्म्याचे ठिकाणी स्थित, निर्योगक्षेमः = योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा, (च) = आणि, आत्मवान्‌ = अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे असा, भव = तू हो ॥ २-४५ ॥

अर्थ

हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥ २-४५ ॥

मूळ श्लोक

   यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
   तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २-४६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ

सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

मूळ श्लोक

   कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
   मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्मणि एव = कर्म करण्याविषयीच, ते = तुला, अधिकारः = अधिकार (आहे), फलेषु = (त्यांच्या) फळांवर, कदाचन = कधीही, मा = नाही (म्हणून), कर्मफलहेतुः = कर्मांच्या फळांचा हेतू, मा भूः = तू होऊ नकोस (तसेच), अकर्मणि = कर्म न करण्याबाबत, (ते) = तुझी, सङ्गः = आसक्ती, मा अस्तु = नको असू देऊस ॥ २-४७ ॥

अर्थ

तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. ॥ २-४७ ॥

मूळ श्लोक

   योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
   सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, सङ्गम्‌ = आसक्ति, त्यक्त्वा = सोडून देऊन, (च) = तसेच, सिद्ध्यसिद्ध्योः = सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबतीत, समः भूत्वा = समान बुद्धी बाळगून, योगस्थः = योगामध्ये स्थित होऊन, कर्माणि = कर्तव्य कर्मे, कुरु = तू कर, समत्वम्‌ = समत्वालाच, योगः = योग (असे), उच्यते = म्हटले जाते ॥ २-४८ ॥

अर्थ

हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते. ॥ २-४८ ॥

मूळ श्लोक

   दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
   बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २-४९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

बुद्धियोगात्‌ = या समत्वरूपी बुद्धियोगापेक्षा, कर्म = सकाम कर्म (हे), दूरेण अवरम्‌ = अत्यंत खालच्या श्रेणीचे (आहे), (अतः) = म्हणून, धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, बुद्धौ = समत्वबुद्धीमध्येच, शरणम्‌ = रक्षणाचा उपाय, अन्विच्छ = तू शोध (म्हणजे बुद्धीयोगाचा आश्रय घे), हि = कारण, फलहेतवः = फळाचा हेतू बनणारे लोक, कृपणाः = अत्यंत दीन, (सन्ति) = असतात ॥ २-४९ ॥

अर्थ

या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. ॥ २-४९ ॥

मूळ श्लोक

   बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
   तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

संदर्भित अन्वयार्थ

बुद्धियुक्तः = समबुद्धीने युक्त असा पुरुष, इह = याच लोकात, सुकृतदुष्कृते उभे = पुण्य आणि पाप या दोहोंचाही, जहाति = त्याग करतो म्हणजे त्यातून मुक्त होऊन जातो, तस्मात्‌ = म्हणून, योगाय = समत्वरूप योगाला, युज्यस्व = तू लागून राहा, योगः = (हा) समत्वरूप योगच, कर्मसु = कर्मांतील, कौशलम्‌ = कौशल्य आहे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे ॥ २-५० ॥

अर्थ

समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. ॥ २-५० ॥

मूळ श्लोक

   कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
   जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ २-५१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, बुद्धियुक्ताः = समबुद्धीने युक्त (असे), मनीषिणः = ज्ञानी लोक हे, कर्मजम्‌ = कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या, फलम्‌ = फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, जन्मबन्धविनिर्मुक्ताः = जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन, अनायम्‌ = निर्विकार (असे), पदम्‌ = परमपद, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात ॥ २-५१ ॥

अर्थ

कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ॥ २-५१ ॥

मूळ श्लोक

   यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
   तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २-५२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यदा = जेव्हा, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, मोहकलिलम्‌ = मोहरूपी दलदल, व्यतितरिष्यति = चांगल्या प्रकारे पार करून जाईल, तदा = तेव्हा, श्रुतस्य = ऐकलेल्या, = आणि, श्रोतव्यस्य = ऐकिवात येणाऱ्या (इह-पर लोकातील सर्व भोगांच्या बाबतीत), निर्वेदम्‌ = वैराग्य, गन्तासि = तुला प्राप्त होईल ॥ २-५२ ॥

अर्थ

जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-पर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ॥ २-५२ ॥

मूळ श्लोक

   श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
   समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २-५३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रुतिविप्रतिपन्ना = तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, यदा = जेव्हा, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, निश्चला = अचल, (च) = व, अचला = स्थिर, स्थास्यति = राहील, तदा = तेव्हा, योगम्‌ अवाप्स्यसि = योग तुला प्राप्त होईल म्हणजे परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल ॥ २-५३ ॥

अर्थ

तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. ॥ २-५३ ॥

मूळ श्लोक

   अर्जुन उवाच
   स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
   स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्‌ ॥ २-५४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, केशव = हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य = परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे, भाषा = लक्षण, का = काय, स्थितधीः = तो स्थिरबुद्धी पुरुष, किम्‌ = कसा, प्रभाषेत = बोलत असतो, किम्‌ = कसा, आसीत = बसत असतो, (च) = आणि, किम्‌ = कसा, व्रजेत = चालत असतो ॥ २-५४ ॥

अर्थ

अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो? ॥ २-५४ ॥

मूळ श्लोक

   श्रीभगवानुवाच
   प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्‌ ।
   आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २-५५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदा = जेव्हा, (अयं पुरुषः) = हा पुरुष, मनोगतान्‌ = मनातील, सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, प्रजहाति = पूर्णपणे त्याग करतो, (च) = आणि, आत्मना = आत्म्याने, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, तुष्टः = संतुष्ट होऊन राहातो, तदा = तेव्हा, स्थितप्रज्ञः = तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्यते = म्हटला जातो ॥ २-५५ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥ २-५५ ॥

मूळ श्लोक

   दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
   वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

दुःखेषु = दुःखांची प्राप्ती झाली असताना, अनुद्विग्नमनाः = ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, सुखेषु = सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत, विगतस्पृहः = जो सर्वथा निस्पृह आहे, (तथा) = तसेच, वीतरागभयक्रोधः = ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत असा, मुनिः = मुनी, स्थितधीः = स्थिरबुद्धी, उच्यते = म्हटला जातो ॥ २-५६ ॥

अर्थ

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ २-५६ ॥

मूळ श्लोक

   यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ ।
   नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्वत्र, अनभिस्नेहः = स्नेहरहित असून, तत्‌ तत्‌ = त्या त्या, शुभाशुभाम्‌ = शुभ किंवा अशुभ वस्तू, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न अभिनन्दति = प्रसन्न होत नाही, (तथा) = तसेच, न द्वेष्टि = द्वेष करीत नाही, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे ॥ २-५७ ॥

अर्थ

जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते. ॥ २-५७ ॥

मूळ श्लोक

   यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
   इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

= आणि, कूर्मः = कासव, सर्वशः = सर्व बाजूंनी, अङ्गानि = (आपले) अवयव, इव = ज्याप्रमाणे (आत ओढून घेते, त्याप्रमाणे), यदा = जेव्हा, अयम्‌ = हा पुरुष, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, इन्द्रियाणि = (आपली) इंद्रिये, (सर्वशः) = सर्व प्रकाराने, संहरते = आवरून घेतो, (तदा) = तेव्हा, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे (असे समजावे) ॥ २-५८ ॥

अर्थ

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे. ॥ २-५८ ॥

मूळ श्लोक

   विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
   रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ २-५९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

निराहारस्य = इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या, देहिनः = पुरुषांच्या बाबतीत, विषयाः = (केवळ) विषयच, विनिवर्तन्ते = निवृत्त होतात, (किंतु) = परंतु, रसवर्जम्‌ = विषयातील आसक्ती निवृत्त होत नाही, अस्य = या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर, रसः अपि = आसक्तीसुद्धा, परम्‌ = परमात्म्याचा, दृष्ट्वा = साक्षात्कार झाल्यामुळे, निवर्तते = संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते ॥ २-५९ ॥

अर्थ

इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥ २-५९ ॥

मूळ श्लोक

   यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
   इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

संदर्भित अन्वयार्थ

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, हि = आसक्तीचा नाश न झाल्यामुळे, प्रमाथीनि = विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), यततः = प्रयत्‍न करणाऱ्या, विपश्चितः = बुद्धिमान, पुरुषस्य = पुरुषाचे, मनः अपि = मनसुद्धा, प्रसभम्‌ = जबरदस्तीने, हरन्ति = हरण करून घेतात ॥ २-६० ॥

अर्थ

हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्‍न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ॥ २-६० ॥

मूळ श्लोक

   तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
   वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अतः) = म्हणून, तानि सर्वाणि = ती सर्व इंद्रिये, संयम्य = वश करून घेऊन, (साधकः) = साधकाने, युक्तः = चित्त स्थिर करून, मत्परः = माझा आधार घेऊन, आसीत = ध्यानाला बसावे, हि = कारण, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), वशे = त्याला वश असतात, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर होऊन राहाते ॥ २-६१ ॥

अर्थ

म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ॥ २-६१ ॥

मूळ श्लोक

   ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
   सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २-६२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

विषयान्‌ = विषयांचे, ध्यायतः = चिंतन करणाऱ्या, पुंसः = पुरुषाची, तेषु = त्या विषयांमध्ये, सङ्गः = आसक्ती, उपजायते = उत्पन्न होते, सङ्गात्‌ = त्या आसक्तीमुळे, कामः = (त्या विषयांची) कामना, सञ्जायते = निर्माण होते, (च) = आणि, कामात्‌ = कामनेमध्ये विघ्न आल्यामुळे, क्रोधः = क्रोध, अभिजायते = उत्पन्न होतो ॥ २-६२ ॥

अर्थ

विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. ॥ २-६२ ॥

मूळ श्लोक

   क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
   स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

क्रोद्धात्‌ = क्रोधामुळे, सम्मोहः = अत्यंत मूढभाव, भवति = उत्पन्न होतो, सम्मोहात्‌ = मूढभावामुळे, स्मृतिविभ्रमः = स्मृतीमध्ये भ्रम होतो, स्मृतिभ्रंशात्‌ = स्मृतीमध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे, बुद्धिनाशः = बुद्धीचा नाश म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, (च) = आणि, बुद्धिनाशात्‌ = बुद्धीचा नाश झाल्यामुळे, (सः पुरुषः) = तो पुरुष, प्रणश्यति = आपल्या स्थितीपासून च्युत होतो ॥ २-६३ ॥

अर्थ

रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥

मूळ श्लोक

   रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
   आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, विधेयात्मा = ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधक, आत्मवश्यैः = स्वतःला वश असणाऱ्या, रागद्वेषवियुक्तैः = राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या अशा, इन्द्रियैः = इंद्रियांच्या द्वारा, विषयान्‌ = विषयांमध्ये, चरन्‌ = वावर करीत, प्रसादम्‌ = अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ २-६४ ॥

अर्थ

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ॥ २-६४ ॥

मूळ श्लोक

   प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
   प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २-६५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

प्रसादे = अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर, अस्य = याच्या, सर्वदुःखानाम्‌ = संपूर्ण दुःखांचा, हानिः = अभाव, उपजायते = होऊन जातो, (च) = आणि, प्रसन्नचेतसः = प्रसन्नचित्त असणाऱ्या कर्मयोग्याची, बुद्धिः = बुद्धी, आशु हि = लौकरच (सर्व बाजूंनी निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच), पर्यवतिष्ठते = उत्तम प्रकारे स्थिर होऊन जाते ॥ २-६५ ॥

अर्थ

अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥ २-६५ ॥

मूळ श्लोक

   नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
   न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥ २-६६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अयुक्तस्य = ज्यांनी मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा पुरुषांच्या ठिकाणी, बुद्धिः = निश्चयात्मिका बुद्धी, न अस्ति = असत नाही, = आणि, अयुक्तस्य = अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात, भावना = भावनासुद्धा, = असत नाही, = तसेच, अभावयतः = भावनाहीन मनुष्याला, शान्तिः न = शांती मिळत नाही, (च) = आणि, अशान्तस्य = शांतिरहित मनुष्याला, सुखम्‌ = सुख, कुतः = कोठून, (भविष्यति) = प्राप्त होईल ॥ २-६६ ॥

अर्थ

मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? ॥ २-६६ ॥

मूळ श्लोक

   इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
   तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २-६७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

हि = कारण, इव = ज्याप्रमाणे, अम्भसि = पाण्यात चालणाऱ्या, नावम्‌ = नावेला, वायुः = वायू हा, हरति = हरण करून नेतो (त्याप्रमाणे), चरताम्‌ = विषयांमध्ये वावरणाऱ्या, इंद्रियाणाम्‌ = इंद्रियांपैकी, मनः = मन, यत्‌ = ज्या (इंद्रियाच्या), अनु = बरोबर, विधीयते = राहते, तत्‌ = ते (एकच इंद्रिय), अस्य = या (अयुक्त) पुरुषाच्या, प्रज्ञाम्‌ = बुद्धीला, (हरति) = हरण करून घेते ॥ २-६७ ॥

अर्थ

कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ॥ २-६७ ॥

मूळ श्लोक

   तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
   इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्मात्‌ = म्हणून, महाबाहो = हे महाबाहो, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, सर्वशः = सर्वप्रकारांनी, निगृहीतानि = निगृहीत केलेली असतात, तस्य = त्या पुरुषाची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर असते ॥ २-६८ ॥

अर्थ

म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. ॥ २-६८ ॥

मूळ श्लोक

   या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
   यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वभूतानाम्‌ = संपूर्ण प्राण्यांच्या संदर्भात, या = जी, निशा = रात्रीप्रमाणे असते, तस्याम्‌ = अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदांच्या प्राप्तीचे ठिकाणी, संयमी = स्थितप्रज्ञ योगी, जागर्ति = जागा असतो, (च) = (आणि), यस्याम्‌ = ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या बाबतीत, भूतानि = सर्व प्राणी, जाग्रति = जागे असतात, सा = ती, पश्यतः = परमात्मतत्त्व जाणणाऱ्या, मुनेः = मुनीला, निशा = रात्रीप्रमाणे असते ॥ २-६९ ॥

अर्थ

सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥

मूळ श्लोक

   आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।
   तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २-७० ॥

संदर्भित अन्वयार्थ

आपूर्यमाणम्‌ = सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचलप्रतिष्ठम्‌ = अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा, समुद्रम्‌ = समुद्रात, यद्वत्‌ = ज्याप्रमाणे, आपः = नाना नद्यांचे पाणी, प्रविशन्ति = त्याला विचलित न करता सामावून जाते, तद्वत्‌ = त्याप्रमाणे, सर्वे = सर्व, कामाः = भोग, यम्‌ = ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी, प्रविशन्ति = (कोणताही प्रकारचा विकार त्याच्या ठिकाणी उत्पन्न न करता) सामावून जातात, सः = तोच स्थितप्रज्ञ पुरुष, शान्तिम्‌ = परम शांति, आप्नोति = प्राप्त करून घेतो (याउलट), न कामकामी = भोगांची इच्छा करणारा (शांति प्राप्त करून घेत) नाही ॥ २-७० ॥

अर्थ

ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. ॥ २-७० ॥

मूळ श्लोक

   विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
   निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २-७१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, विहाय = त्याग करून, यः = जो, पुमान्‌ = पुरुष, निर्ममः = ममतारहित, निरहङ्कारः = अहंकाररहित, (च) = आणि, निःस्पृहः = स्पृहारहित होऊन, चरति = वावरत असतो, सः = तोच (पुरुष), शान्तिम्‌ = शांतीप्रत, अधिगच्छति = प्राप्त होतो, म्हणजे शांती प्राप्त करून घेतो ॥ २-७१ ॥

अर्थ

जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते. ॥ २-७१ ॥

मूळ श्लोक

   एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
   स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २-७२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा ब्राह्मी स्थितिः = ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची ही स्थिती आहे, एनाम्‌ = ही स्थिती, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, (योगी) = योगी, (कदापि) = कधीही, न विमुह्यति = मोहित होत नाही, (च) = आणि, अन्तकाले अपि = अंतकाळी सुद्धा, अस्याम्‌ स्थित्वा = या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन, (सः) = तो, ब्रह्मनिर्वाणम्‌ = ब्रह्मानंदाप्रत, ऋच्छति = जातो (म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो) ॥ २-७२ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. ॥ २-७२ ॥

मूळ दुसऱ्या अध्याय समाप्ती

   ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
   साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा हा दुसरा अध्याय समाप्त झाला. ॥ २ ॥