पान:Yugant.pdf/255

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २३७
 

फक्त वरच्या तीन लोकांना होता, दासांना नव्हता. तोच प्रकार आजपर्यंत अमेरिकेत होता. इतर पाश्चात्त्य देशही एकाच वेळी घरी लोकसत्ताक व बाहेर साम्राज्यवादी होते व आहेत. आपले व परकीय, आपले देव व परकीयांचे देव, आपले हक्क घेण्याची व परकीयांना हक्क न देण्याची प्रवृत्ती हे सर्व तेव्हा होते, आताही आहे. मात्र तेव्हाच्या लिखाणात ह्या गोष्टी स्पष्ट आहेत. तेव्हाचे मानवसमाज लहान-लहान होते. ह्या तऱ्हेची समाजव्यवस्था हीच स्वाभाविक समजली जाई. तीत लपवण्यासारखे काही वाटत नसे. हल्ली पूर्वीच्या गोष्टीपैकी खूपच गोष्टी शिल्लक आहेत. पण त्या जणू नाहीतच, अशा भावनेने लोक लिहीत असतात. जुने नुसते त्याज्यच नाही, तर हल्लीच्या काळाला गैरलागू, अशी बऱ्याच लोकांची समजूत असते, तसे ते नाही. जुने कधीही सर्वस्वी टाकाऊ व सर्वस्वी गैरलागू होत नाही; नवे ते इतके नवे कधीही नसते की त्यात जुन्याचा अंशच नाही, अशी मानवशास्त्राची बैठक आहे. जुने, नवे, जवळ-जवळचे तसेच लांब-लांबचे, अप्रगत व प्रगत, सगळेच मानवसमाज अभ्यासास योग्य आहेत. अभ्यास व्हावा तो पूर्वी काय होते व आज काय आहे, त्याची तुलना करता येईल, ह्या दृष्टीने व्हावा. अभ्यासाआधीच ठाम मते ठरवून मूर्तिपूजकाप्रमाणे भक्तिभावानेही होऊ नये व मूर्तिभंजकाच्या आवेशाने द्वेषभावनेनेही होऊ नये, इतकीच प्रार्थना.

  

 हे सर्व लिहीत असताना एका मित्राने एक विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तिमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतिपूजा त्याने कशी पत्करली? गोमांसासुद्धा सर्व तऱ्हेचे मांस खाणारे शेवटी गाईचे शेण खाऊन व मूत पिऊन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजू लागले ?