पान:Yugant.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


युगान्त / २३५ ________________

लोक ऐहिक गोष्टीत फार पुढारलेले नव्हते. इतर आर्यभाषिकांप्रमाणेच मिसर व बावेरु येथल्या सेमिटिक-होमिटिक लोकांच्या मानाने ते मागासलेलेच होते. त्यांची शस्त्रे उत्तम होती व वाहनांमुळे त्यांना जलदगती होती. घोडा हे जनावर त्यांनीच नव्याने मिसर व बावेरु (इजिप्त व बाबिलॉन) देशांत नेले व त्याच्याच सहाय्याने ते देश जिकून काही काळ त्यांनी त्यांवर पगडा बसवला. ह्याच भाषिक समूहातील लोक ग्रीसमध्ये गेले. ग्रीसमधील समाजव्यवस्था, दैवते व महाभारतातील चित्र ह्यांत विलक्षण साम्य आहे, व विचार करायला लावतील, असे फरकही आहेत. त्यांनीही अशाच एका जुन्या लढाईचा 'इलियड' नावाच्या अमर काव्यात वृत्तान्त दिला आहे. त्यात ती समाजस्थिती दिसते, ती आपल्या महाभारतकालीन समाजस्थितीशी जुळती आहे. तेथेही लहान-लहान राज्ये होती. सगळे राज्यकर्ते एकमेकांच्या बरोबरीचे होते; व ट्रॉयच्या युद्धात या राजांचे मानापमान करता-करता बिचाऱ्या आगामेम्नॉनची दुर्योधनाप्रमाणेच अवस्था झाली होती. ग्रीक कथेत देवादिकांची ढवळाढवळ महाभारतकथेपेक्षा जास्त आहे. ग्रीक देव एकमेकांशी भांडतात. ग्रीक कथातून देवींचे स्थान स्वतंत्र, (उदा. पालासअथीनी)- देवांइतकेच महत्त्वाचे आहे. महाभारतकाळापर्यंत आपल्याकडे देवींना व देवांच्या बायकांना स्थान नाही. दोन्ही समाज पितृप्रधान असूनही ग्रीकांच्या कथांत स्त्रियांची चरित्रे ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व विविध आहेत. मानवी समाजात काय, किंवा स्वर्गात काय, ग्रीकांमध्ये स्त्रीला भारतातल्यापेक्षा जास्त महत्त्व होते, ह्यांत शंकाच नाही. ग्रीकांच्या मानाने आपल्याकडील स्त्रिया उदात्त असल्या, तरी एकाच ठशाच्या व कटाळवाण्या वाटतात. माता व पत्नी ह्या दोन भूमिकांतच त्या दिसतात. नवऱ्याने पोटच्या पोरीला देवाला बळी दिली, हे निमित्त पुढे करून नवऱ्याला मारणारी क्लिटेमनेस्ट्रा, आपला मुलगा मेलिआगर खान आपला भाऊ थेस्टिआडीस ह्याला भांडणात मारले म्हणून रागाच्या भरात मेलिआगरला मारणारी त्याची आई आलथिआ,