पान:Yugant.pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१६ / युगान्त


व जुनी मूल्ये सर्वस्वी टाकाऊ कधीच होत नाहीत. मानवांना जशा तऱ्हेचे अनुभव एकदा आले, तशाच तऱ्हेचे अनुभव जेव्हा परतपरत येतात, तेव्हा ह्या जुन्या मूल्यांची वा घडणींची आठवण ठेवणे उपयुक्त ठरते. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत मोठी साम्राज्ये लयास गेलेली असल्यामुळे बरोबरीच्या अनेक घटकांनी एकत्र नांदावयास कसे शिकावे, हाच प्राचीन भारतीयांचा पेच आपल्यापुढे आलेला दिसत आहे.
 महाभारतातील दैवतकल्पना जास्त प्रमाणात वेद-ब्राह्मणकालीन आहे; पुराणकालीन नाही. महाभारतात मूर्ती व देवळे ह्यांचे उल्लेख नाहीत.* शिवस्तोत्र व विष्णुसहस्त्रनाम वा सूर्याची नावे ही मागाहून घुसडलेली व प्रक्षिप्त वाटतात. ही भांडारकर आवृत्तीत असली, तरी मागाहूनचीच आहेत, ह्यात शंका नाही. सूर्यपूजा (प्रातःकाली वा सायंकाळी) ही वर दिलेल्या तीन दैवतांच्या पूजांपैकी जुनी असण्याचा संभव आहे. त्र्यंबक वा शिव नंतरचा, व शांतिपर्वात आलेले विष्णुसहस्त्रनाम सर्वात शेवटचे असावे. महाभारतातील धर्म यज्ञप्रधान दिसतो. राजाचा पुरोहित अग्नी प्रज्वलित ठेवून रोजच्या आहुती देत असे. यज्ञामध्ये पशूची आहुती होतीच. अश्वमेधात नक्कीच, इतरांतही बहुतकरून असावी. तरीही पुढच्या काळात यज्ञक्रिया ज्या महत्त्वाला पोहोचली, तितक्या महत्त्वाला ती गेली


 

*'देवायतन' हा शब्द चार वेळा आलेला आहे. आदिपर्व ६४.४०, अनुशासन १०.१८, आश्वमेधिक ६९.१५ व भीष्मपर्व १०८.११. त्याचप्रमाणे भीष्मपर्व अध्याय १०८ यामध्ये निरनिराळे अशुभ शकुन कसे झाले, त्यांचे वर्णन आहे.त्यात देवायतनातील देवता कंप पावल्या, हसल्या, रडल्या,नाचल्या असे वर्णन आहे.ही सर्व वर्णने पुढील काळात येणाया साचेबंद वर्णनासारखी आहेत, म्हणून ती मागाहून घातल्यासारखी वाटतात. भीष्मपर्वातला श्लोक तर फारच पुढच्या काळातील वाटतो. त्यातील 'कुलदैवत' किंवा एखाद्या माणसाचे खास असे ‘दैवत' ह्या कल्पना उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयात वारंवार येतात. महाभारतात एकदाच आलेली ही कल्पना इतर गोष्टींशी संबंध नसलेली अशी आहे...

देवतायतनस्थाश्च कौरवेन्द्रस्य देवताः।
कम्पन्ते च हसन्ते च नृत्यन्ति च रुदन्ति च।