पान:Yugant.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १६५
 

 कृष्णाच्या मनात क्षत्रियत्व व क्षत्रियांचे परस्पर संबंध यांबद्दल काही कल्पना होत्या. स्वतःच्या कुळाला दिलेल्या उपद्रवामुळे त्याचा जरासंधावर राग होता हे जितके खरे, तितकेच जरासंध वर वर्णन केलेल्या क्षत्रियनीतीला धरून वागत नव्हता, व त्याने शंभर राजे कैदेत टाकून त्यांना बळी देण्याचा घाट घातला होता, हेही कारण त्याच्या रागाला होते. महाभारतामध्ये निरनिराळ्या कुळांचे एकमेकांशी संबंध कसे गुंतागुंतीचे होते ते ह्या प्रकरणात दिसून येते. चंदीचा राजा शिशुपाल हा यादवांच्याच एका मुलीचा मुलगा. पांडवांशी कृष्णाचे जे नाते, तसेच शिशुपालाशीही होते. पण शिशुपाल इतर काही कारणांमुळे कृष्णाचा वैरी व जरासंधाचा हस्तक झालेला होता. कृष्णाने योजिलेल्या कार्यात शिशुपालाचा नाश करणे हे नव्हते. जरासंधाचा काटा काढून टाकायचा, हे मात्र त्याच्या मनात होते व तो त्या संधीची वाट पाहत होता. जरासंधाला मारून त्याने बंदीत टाकलेल्या राजांना मुक्त करणे व क्षत्रियांचे पूर्वापार-संबंध परत प्रस्थापित करणे हे तो एक महान कार्य समजत होता. क्षत्रिय-समाजाविषयीची ही त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाकांक्षा होती.
 ह्या सर्व भानगडीत कृष्णाचा काही वैयक्तिक लाभ झालेला दिसत नाही. हे सर्व राजकारण कुलासाठी आणि त्या वेळच्या एकंदर राजकीय संबंधांबद्दल होते. कृष्णाला केवळ स्वतःची अशी आकांक्षाच नव्हती का? शूर व पराक्रमी असूनही अर्जुनाप्रमाणेच धाकटा भाऊ असल्यामुळे तो राजा झाला नव्हता. एकदा का त्याने राज्य पत्करले असते. तर थोरल्या मुलाला गादीवर बसवायचे ही रूढी मोडली असती व मग यादवांयादवांत भांडणे लागली असती; म्हणून त्याने जाणून-बुजून कमीपणा पत्करला होता. पण जरी राजा होता आले नाही, तरी कृष्णाला एक मोठी महत्त्वाकांक्षा होती, हे महाभारतावरून स्पष्ट दिसते. ती महत्त्वाकांक्षा ‘वासुदेव' होण्याची !