पान:Yugant.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/ १११
 




सात



‘परधर्मो भयावहः'




 महाभारतात ब्राह्मणांचे स्थान एकंदर कथेच्या दृष्टीने अगदी मध्यवर्ती नसले, तरी गोष्टीच्या परिपोषाला महत्त्वाचे असे आहे. हे स्थान द्रोण व अश्वत्थामा ह्या पितापुत्रांना आहे. काही ब्राह्मण व त्यांचे उल्लेख मात्र निरर्थक म्हणून सोडून देता येतील. परशुरामाचा लेख ह्यापैकीच आहे. महाभारतात आलेला परशुराम भीष्माशी कित्येक आठवडे युद्ध करून पराभूत होतो व कर्णाला 'तुला आपल्या विद्येचे आयत्या वेळी विस्मरण होईल,' असा शाप देतो. परशुराम ही व्यक्ती रामावताराच्याही आधीची. आपले क्षत्रियसंहाराचे भयानक कृत्य आटोपून तो तपश्चर्येला निघून गेला, अशी परशुरामाची कथा आहे. एकदा रामावतारात त्याला त्याच्या तपश्चर्येतून परत आणले ते रामाचा मोठेपणा दाखवण्यासाठी! रामायणातील कथावस्तूशी त्याचा काहीही संबंध नाही. भीष्म किती शूर व किती सत्यप्रतिज्ञ होता, हे दाखवण्यासाठी परशुराम महाभारतकथेत घुसडला आहे. परशुरामाला भीष्माने पूर्णतया माघार घेण्यास लावली व परत एकदा क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कसा, हे दाखवून दिले.

 त्याचप्रमाणे कर्ण शूर म्हणून गाजलेला. त्याचा अर्जुनाकडून