पान:Yugant.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



युगान्त / १०९
 


नाही. खुद्द पांडव-वंशालाही जनमेजयामागून लौकरच हस्तिनापूर सोडून कौशाम्बीला राजधानी करावी लागली. इन्द्रप्रस्थाच्या यादव-वंशालाही तसेच करावे लागले असणार. उत्तरेकडून नव्या-नव्या लोकांच्या स्वाऱ्या होत होत्या. महाभारत युद्धाने खिळखिळी झालेली क्षत्रियकुले त्याला तोंड देऊ शकली नाहीत. महाभारतकालीन कुरु-पांचालांतील राजकुले, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था सर्वच नष्ट झाली. ह्यापुढे नाव ऐकू येते ते मगधाचे, कुरु पांचालांचे नव्हे. ह्या सर्व उत्पातात हस्तिनापूर नष्ट झाले, इन्द्रप्रस्थही नष्ट झाले. पण हस्तिनापूर एक दीर्घकालीन परंपरा ठेवून गेले. हस्तिनापुरात कुरुवंशाने कित्येक शतके राज्य केले. तेथल्या राजांच्या व राण्यांच्या अद्भुत वा रम्य किंवा अगदी साधारण अशा जीवनकथांशी हस्तिनापुराचे नाव कायम जडलेले आहे. हस्तिनापुराच्या रस्त्यांची वर्णने आहेत, तेथील नागरिक निरनिराळ्या प्रसंगी काय बोलले, त्याची नोंद आहे; कुंतीला आसरा देणाऱ्या विदुराचे घर तेथे होते; धृतराष्ट्राची राजसभा तेथे होती; द्रौपदीला ज्यातून ओढून आणले ते अंतःपुर तेथे होते; शेवटी शोक करणाऱ्या कौरव-स्त्रियाही तेथेच होत्या.
 इन्द्रप्रस्थाशी कोणताही राजवंश निगडित नाही. खांडवदाहाच्या भयानक गोष्टीखेरीज संस्कृत वाङ्मयातील कोणतीही कथावस्तू ह्या शहराचा आसरा घेऊन नाही, त्याला घनता नाही. कोणताही आकार आलाच नाही. मयसभेची वास्तू तर नुसती अपशकुनीच नव्हे, तर आभासमयच राहिली. माणसाच्या तामसी वृत्तीतून निर्माण झालेल्या क्षणभंगुर, नेत्रदीपक, हृदयदाहक अशा 'आसुरी संपत्तीचे' ते एक स्वप्नवत् दर्शन ठरले.

 सप्टेंबर, १९६४