पान:Sanskruti1 cropped.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पिढीजाद राजधानी, सर्व भांडण होते ते त्या राज्याबद्दलच होते. काही शतकांनी हस्तिनापुरावर काही संकट कोसळले व त्या वेळच्या कुरुराजाला राजधानीं सोडून जावे लागले. त्याने कौशांबी ही आपली राजधानी केली. अयोध्या हीसुद्धा इक्ष्वाकूंची पिढीजाद राजधानी होती. मनूपासून कित्येक मोठमोठ्या राजांनी तेथे राज्य केलेले होते. ही परंपरागत राजधानी रामानंतर नष्ट झाली. एवढेच नव्हे, तर पूर्वी कधी न ऐकिलेल्या 'साकेत’ अशा नवीनच नावाने ती ओळखू जाऊ लागली. राम,लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न ह्यांच्या मुलांनी निरनिराळ्या ठिकाणी राज्ये स्थापिली, असा वृत्तांत आहे. रामाची मुले बापाच्या गादीवर का बसली नाहीत? रामाच्या मागे अयोध्या ओस पडली होती, असे वर्णन आहे. रामाच्याबरोबर सर्व प्रजाजन स्वर्गात गेले, म्हणून अशी अवस्था झाली का? हे वर्णन प्रक्षिप्त वाटते. पण अयोध्या ओस पडली आणि तिच्याऐवजी 'साकेत' हे एक नवीनच शहर उदयाला आले, एवढे मात्र खरे दिसते. पण त्याचे कारण मात्र कोठेही रामायणात व इतरत्र दिलेले आढळत नाही. रामाने आपल्या जिवंतपणीच आपल्या मुलांना दुसरीकडे राज्ये दिली, असे वर्णन आहे. असे का ? हेही कोडेच आहे. कृष्णाची द्वारका कृष्णाबरोबर गेली. कृष्णाखेरीज दुस-या कोणाचे नाव द्वारकेशी निगडीत नाही तसे अयोध्येचे नाही. अतिशय पराक्रमी, पुण्यवान अशा वंशाची ती राजधानी होती. ती नाहीशी का झाली? कशी झाली? हा एक शोध घेण्यासारखा प्रश्न आहे. महाभारताचे नुसते कथासूत्रच एक आहे असे नव्हे, तर स्वभावदर्शनही अशा त-हेचे आहे की, त्यामुळे गोष्टीला एक विशिष्ट दिशा मिळते. दोन मुले थोरला अंधळा म्हणून बाजूला ठेविलेला. धाकट्याला गादी मिळाली. पण तो ती उपभोगू शकला नाही. थोरल्याचे व धाकट्याचे मुलगे एकाच राजवाड्यात त्याच वडील माणसांच्या हाताखाली राजपुत्र म्हणून वाढले. सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीने ती चुलतभावंडे एकमेकांची स्पर्धक होती. त्या भावंडांचे व त्यांच्या बरोबरीच्या मित्रमंडळींचे, नातेवाइकांचे व वडील मंडळींचेही स्वभाव, स्पर्धा शिगेला पोहोचावी असेच होते. कथेला

                                                                    ।। संस्कृती ।।