पान:Gangajal cropped.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १७

माणसांचे काय होईल? अज्ञान माणसे नसतील तर त्यांना सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणाच्यांचे काय होईल? असल्या प्रकारचा हा आचरट प्रश्न नाही. माणसाला ध्येये असावीत, म्हणून देवाने जगात अपूर्णता ठेविली आहे, असेही नाही. जगात पूर्णता असली, तरी काही उणे आहे असे वाटत राहील व सारखे वाटत राहते. ते पूर्ण करायची जी इच्छा, तिचे प्रतीक देऊळ आहे"

 माझ्या मनात नव्याने एक विचार आला. मी म्हटले, "आपल्या संतांनी शरीराला 'देहगाव' म्हटले आहे. ह्या गावातसुद्धा देऊळ वा देव असलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बाहेरच्या गावातून देव नसला तरी तो चालेल, पण अंतर्यामी तो असावा, अशी त्यांची भावना होती. आयुष्यात मिळण्यासारखे असेल ते मिळाले, तरी मनाची कशासाठी तरी धडपड चाललेली असते. काहीतरी अशांतता मनाला पोखरीत असते. कशामुळे तरी निराधार वाटत असते."

 माझे म्हणणे मध्येच थांबवून तिने विचारले, “तू म्हणतेस हे मरणाच्या जाणिवेमुळे तर नसेल? अगदी सुखात बुडालेले असलो, तरीसुद्धा ह्या सुखाला अंत आहे, अशी बोचणी असते. कितीही जिवास जीव देणारे मित्र असले, तरी आपण एकाकीच आहोत, एकटेच राहणार व एकटेच जाणार, ह्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो. मनाची धडपड. अशांतता, अगतिकता सर्व ह्यामुळेच असेल. हृदयातल्या देवाला शोधण्याची, त्याच्यासाठी लागलेल्या तहानेची ती धडपड नसेलच मुळी!"

 "तेही खरेच. दोन्ही तऱ्हांची माणसे आहेत. काही अंतर्यामात देव शोधीत असतात. जगण्याला काहीतरी अर्थ शोधीत असतात. आणि जीवन सर्वस्वी अर्थहीन आहे, पण ते शक्य तितके सुखावह करणे, मानाने जगणे व इतरांना जगविणे ह्या बुद्धीने काही जगत असतात. एका दृष्टीने ह्या ध्येयवाद्यांना कुठचातरी देव सापडलेला असतो. काहींना हा ध्येयवाद नसतो. ते आपले स्वत:चे. अगदी सर्वस्वी स्वत:चे असे एक जीवन जगतात. जगातले जेवढे मिळण्यासारखे असेल, ते ते घेत राहतात; आणि एक दिवस- एका क्षणी- स्वतःच्या एकाकीपणाची, असहायतेची व निष्फळतेची त्यांना इतकी तीव्र जाणीव होते की, त्याने जगणे अशक्य होऊन ते जीव देतात.

 "बाळ व लहानी तुला माहीत आहेतच. काय उमदी पोरे होती! त्यांना काही कमी नव्हते. दोघांचीही परिस्थिती बाहेरून दिसायला हेवा करण्यासारखी! दोन्ही पोरे अगदी रस घेऊन सर्वतया जीवन जगत होती.