पान:Gangajal cropped.pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १३७


मांडण्यासाठी एक गोष्ट सांगितली काय, किंवा तो मुद्दा अधिक बळकट व्हावा म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या काय किंवा एकाच गोष्टीचे निरूपण करून त्यातून नानाविध प्रकारांचा बोध काढिला काय, विवेचनाची मांडणी तार्किक असेल तो वैचारिक निबंध, आणि, जेथे विवेचनाची मांडणी तार्किक नसल तो मात्र ललित-निबंध, या भूमिकेला मान्यता देता येणे कठीण आहे. शास्त्र आणि ललितवाङमय यांच्यातील सीमारेषा मांडणीची तर्कनिष्ठता किवा मांडणीची अतार्किकता ही नसते. हा मांडणीवरून निर्माण होणारा फरक नाही; तर तो मूळ भूमिकेचाच फरक आहे, फडके काय, खांडेकर काय, की काणेकर काय, त्यांच्या दृष्टीने ललित-निबंध हा निबंधच होता; फक्त त्याची मांडणी निराळी होती. ही भूमिका त्यांनी जाणीवपूर्वक घेतली होती काय? ती त्यांच्या मनात होती काय? हे प्रश्न वाङमयाच्या चर्चेत- अप्रस्तुत आणि गैरलागू आहेत. फडके, खांडेकर, काणेकर यांच्या मनात काय होते, हा मुद्दा तिघांनाही आत्मवृत्तांत स्पष्ट करण्यासाठी मोकळा ठेवीला पाहिजे. पण त्यांच्या वाङमयाचे स्वरूप मात्र वर सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मांडणीची सीमारेषा ठरविणारे असे आहे.

 मराठीतील टीकाकारांना खांडेकरांचे सगळेच ललितवाङमय नेहमीच कृत्रिम वाटत आले आहे. तेव्हा त्यांना खांडेकरांचा लघुनिबंध कृत्रिम वाटला तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. इतर वाङमयप्रकारांचे काहीही असो, पण खांडेकरांचा ललित निबंध कृत्रिम असला तरी मनोरंजक आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. उदाहरण म्हणून खांडेकरांचा 'श्रावणा' सारखा ललित-निबंध घेतला, तरी हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. जीवनात सुखे आहेत. दु:खे आहेत. हसणे-रडणे, वासना-क्षोभ हे सगळेच जीवनात आहे. पण यांपैकी एकही जीवनाचे मूल्य नाही. संयम हे जीवनाचे खरे मूल्य आहे. असा मुद्दा खांडेकरांना पटवून द्यावयाचा आहे. त्यासाठी 'श्रावण' या ललित-निबंधाचा जन्म आहे. जर हा निबंध वैचारिक असता, तर खांडेकरांनी त्याची मांडणी निराळी केली असती. पण कुठल्यातरी अनौपकरिक आणि अप्रस्तुत भासणाऱ्या घटनेने आरंभ करून खांडेकर वाचकांना कृत्रिम अशी भुरळ घालू इच्छितात. कुणीतरी पोरगा त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे. तो अनेक प्रश्न विचारीत आहे. विचारिता-विचारिता एक प्रश्न तो मुलगा विचारितो, "तुमचा आवडता महिना कोणता? आणि खांडेकर सांगतात, “आवडता महिना श्रावण."