पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/542

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

[५२६] वलांत-जसें मोठमोठीं घरेंदारें, दागदागिने वगैरेंत न घालतां उत्पन्नी भांडवलांत किंवा उत्पादक भांडवलांत घालावयास शिकल पाहिजे व हें साधण्याकरितां पेढ्यांची संख्या होतां होईल तितकी वाढली पाहिजे व याकरितां व्यांपारी सचोटी इत्यादि गुण आपल्यांत आणले पाहिजेत. योजकांचा वर्ग वाढविण्याकरितां धंदेशिक्षणाकडे लोकांनीं व विशेषतः देशांतील बुद्धिमान लोकांनीं जास्त लक्ष दिलें पाहिजे. याकरितां योग्य व खऱ्या गुणी माणसांना परदेशीं पाठवून त्यांना धंद्यांत व मोठ्या प्रमाणावरील कारखाने चालविण्याच्या कामांत तरबेज करुन आणलें पाहिजे व याकरितां देशांत शास्त्रीय व यांत्रिक ज्ञानाचा जितका प्रसार होईल तितका केला पाहिजे व या कामींही सरकार व लोकपक्ष यांनीं सहकारित्वानें काम केलें पाहिजे. हिंदुस्थानच्या सद्य:सांपत्तिक स्थितींत सुधारणा करण्याचे वरील उपाय अर्थशास्त्राच्या तत्वानुरुप आहेत हें वाचकांच्या सहज ध्यानांत येईल. हे उपाय एकसमयावच्छेदेंकरून व होतां होईल तितक्या झपाट्यानें अंमलांत आणल्यास हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति भराभर सुधारत जाईल यांत शंका नाहीं. परंतु हिंदुस्थानच्या सांपत्तिक अवनतीचा शेवटचा फेरा आतां ओलांडून गेलेला आहे व चाकाला वरची गति मिळाली आहे यांत शंका नाहीं. हीच गति कायम ठेवणें व तिलाच आणखी वेगवान् करणें हें सुशिक्षितांचें खरें काम आहे.अशी जोराची गति गेल्या चारपांच वर्षात मिळालीही आहे व ही गति देणारें कारण स्वदेशीची वाढती भावना होय. वास्तविक पणें पाहतां स्वदेशीचा प्रसार होणें म्हणजे स्वावलंबनानें सरंक्षण तत्वाचा स्वीकार करणें होय व वर सांगितल्याप्रमाणें हिंदुस्थानची स्थिति हल्लीं संरक्षण तत्वाच्या स्वीकारास अनुकूल आहे. परंतु अधिक आवेशाच्या भरांत या अर्थशास्त्राला अनुमत अशा स्वदेशीमध्यें बहिष्काराचें मिश्रण कर-ण्याचा जो प्रयत्न झाला तो मात्र देशाला हानिकर आहे यांत शंका नाहीं. कारण स्वदेशी व बहिष्कार यांचा संयोग ह्मणजे अमृत विषाच्या संयोगासारखा आहे. कारण स्वदेशी ही प्रेममूलक भावना आहे तर बहिष्कार हा द्वेषमूलक भावना आहे; स्वदेशी ही सात्विक मनोवृत्तीची दर्शक आहे