पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २८१ ] पाठवावयाची अशी पद्धति आहे. ज्याचें वार्षिक उत्पन्न ११ पौंड ४ शिलिंगच्यावर नाहीं त्याला दर आठवडयास ५ शिलिंग पेन्शन मिळतें. उत्पन्नाच्या प्रत्येक २ पैौंड १२ शिलिंग ६ पेन्स या रकमेच्या वाढीला १ शिलिंगानें पेन्शन कमी व्हावयाचें असा नियम आहे. १९०९ मध्यें ६४७४९४ लोकांना पेन्शन मिळालें. वरील विवेचनावरून सामाजिक पंथाच्या पोटभेदांपैकीं राष्ट्रीय सामाजिक पंथ हाच व्यवहार्य पंथ आहे व त्याच्या योजना दिवसेंदिवस सुधारलेल्या सरकारला पसंत पडत चालल्या आहेत असें दिसतें. कारण हा पंथ हाणजे एक व्यावहारिक तडजोड आहे. खासगी मालमत्तेची संस्था ही समाजाच्या आधिभौतिक सुधारणेची गुरुकिल्ली आहे हें या पैथाला दिसून येते‌‌; तसेंच मानवी ज्ञानाच्यामुळें सुष्टीशक्ति व यंत्रशक्ति यांचा संपत्तीच्या उत्पत्तीमध्यें उपयोग होऊं लागल्यामुळें विराटस्वरूपी कारखान्याची पद्धतिही अर्वाचीन काळीं अनिवार्य आहे हेंही या पंथाला दिसतें. परंतु या गोटी सर्वथा इष्ट आहेत व त्यामध्यें अनिष्टाचें मिश्रण मुळीच नाहीं व म्हणूनच सरकारनें औघोगिक बाबतींत " उगीच रहावें हेंच तत्व स्वीकारलें पाहिजे अर्से मात्र या पंथाला अभिमत अर्थशास्त्रकारांप्रमाणें वाटत नाहीं. उलट खासगी मिळकतीच्या संस्थेपासून कांहीं अनर्थ उद्भवतात; विराटस्वरूपी कारखान्याच्या पद्धतींत मजुरांचा चुराडा होतो हें व याचा परिणाम समाजामध्यें संपत्तीची अत्यंत विषम वांटणी होते हें या पंथाला स्पष्टपणें दिसून येतें व म्हणुनच या पंथाला सरकारनें कायदारूपी अस्त्रानें ही विषमता काढून टाकली पाहिजे असें वाटतें. व म्हणून या पंथानें मजुरांची स्थिति सुधारण्याकरितां पुष्कळ खर्चाच्या योजना अंमलांत आणिल्या आहेत व खर्चाच्या योजना अंमलांत आणण्यास लागणारा पैसा उत्पन्न करण्याची कराची पद्धति ही न्यायास धरूनच आहे असें या पंथास वाटतें. वर सांगितलेंच आहे की, सरकार या संस्थेनें खासगी मालकीचें संरक्षण होते व या खासगी मालकीच्या संरक्षणामुळें श्रीमंताचा फारच फायदा होतो. तेव्हां या फाययाचा थोडा जास्त वांटा सरकारनें या लोकांपासून घेऊन सरकारचा ज्या लोकांना कमी फायदा होतो त्यांची स्थिति सुधारण्यास त्या पैशाचा उपयोग करावा हें अगदीं रास्त आहे. असें या पंथाच म्हणणें आहे व तें युक्तीस धरून आहे असें कबूल करणें भाग आहे.