पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २६२ } पंथाचा अंगीकार करून तद्नुरूप कायद्यानें सुधारणा घडवून आणण्याचा उपक्रम केला.

  प्रिन्स बिसमार्कचा या बाबतींतील सल्लागार व राष्ट्रीय सामाजिक पंथाचा अधिकारी लेखक म्हणजे वागनर होय. या पंथाचें स्वरूप व कार्य आणि या पंथाप्रमाणें घडवून आणावयाच्या सुधारणा याबद्दलची स्पष्ट व मुद्देसूद माहिती याच्याच ग्रंथावरून मिळते.
 वागनर याच्या मताप्रमाणें समाजांतील निरनिराळ्या वर्गामध्यें हितैक्य व प्रेमसंबंध उत्पन्न करणें; अन्यायाचा प्रतिकार करणें; हाेेताहोईल तितकी संपत्तीची वांटणी समतेच्या व न्यायाच्या तत्वावर करणें; व कनिष्ट व मध्यम वर्गातील लोकांची नैतिक व सांपत्तिक स्थिति सुधारून एकंदर समाज प्रगतीच्या मार्गाला लागेल अशा तऱ्हेची व्यवस्था कायद्यानें घडवून आणणें हा राष्ट्रीय सामाजिक पंथाचा कार्यभाग आहे. या पंथाचें म्हणणें असें आहे कीं, पूर्वीची सरकारच्या कर्तव्यकर्माची संकुचित कल्पना सोडून दिली पाहिजे. कनिष्ट वर्गाची स्थिति सुधारण्याकरितां औद्योगिक कामांत सरकारनें हात घालण्यास हरकत नाहीं. स्वावलंबन सहकारितां वगैरे तत्वें चांगली आहेत व त्यांना होता होईल. तों उत्तेजनही दिलें पाहिजे. परंतु यानें सर्व कार्यभाग होईल असें मात्र नाहीं. तर कायद्याने मजुरांची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न सरकारनें केला पाहिजे. उदाहयार्थ काम तास ठरविणें, सुट्या ठरविणें,गिरणीबद्दलचे कायदे, कारखनदारांनीं हवाशीर व आरोग्यकर कारखाने ठेवण्याची अवश्यकता वगैरे प्रकारचे इंग्लंडांत पास झालेले कायदे हे राष्ट्रीय सामाजिक पंथाच्या तत्वानुरूपच आहेत; परंतु सरकारनें मजुरांना पेन्शनें मिळण्याची सोय करणें;त्यांच्या आयुष्याचा विमा उतरण्याची व्यवस्था करणें; त्यांच्या आजारीपणांत किंवा  त्यांना अपघात झाला असतांना त्यांच्या पोटापाण्याची तजवीज करणें; हीं सर्व कामें सरकारनें हातीं  घेतलीं पाहिजेत, असें या पंथाचें मत आहे. तसेंच ज्या ठिकाणीं  ज्या धंद्यांत एकाच व्यक्तीच्या किंवा संघाच्या ताब्यांत सर्व संपतीची उत्पत्ति गेल्यामुळे मजूर लोकांवर जुलूम होण्याचा संभव आहे असे धंदे. सरकारनें हाती घेणें हेही सरकारचें काम आहे.शिवाय समाजामध्यें असमता उत्पन्न होण्याचें एक मुख्य  कारण म्हणजें स्थावर मिळकतीची खासगी