पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२६० ] उत्पन्न करतें तर या संस्थेचे संरक्षक जें सरकार तेंही अनिष्टच झालें. तेव्हां जर बहुजनसमाजाला समता व सुख हीं पाहिजे असतील तर तीं मिळविण्याचा खरा उपाय म्हणजे सरकार ही संस्था नाहीशी करणे हृा होय व ज्या अर्थी या संस्थेच्या हातीं सर्व सत्ता आलेली आहे त्या अर्थी ही संस्था सामोपचारानें किंवा कायद्याच्या पद्धतीनें कधींच नाहींशी होणार नाहीं. कारण या पद्धतींत त्या संस्थेची सत्ताच कबूल करणें हें पहिलें कलम असतें व म्हणून मनुष्याची दास्यशृंखला अशा प्रयत्नांनीं जास्त घट्टच होत जाते. तेव्हां ही प्रचंड संस्था नाहींशी करण्याचा उत्तम उपाय म्ह्णजे क्रांतिकारक मार्गाचा अवलंब करणें हृा होय. म्हणून या पंथाच्या लोकांनीं डायनामाइट, बॉब, गुप्तकट, खून वगैरेंसारख्या मार्गाचा अवलंब केलेला आहे. प्रत्येक सुधारलेल्या देशांत या पंथाला समाजाचे शत्रू व मोठे गुन्हेगार समजले जातात. खुद्द या पंथाचे लोकही आपण सर्व प्रकारच्या सत्तेचे शत्रू आहोंत असें स्पष्टपणें कबूल करतात. या पंथाच्या १८८२ मध्यें झालेल्या जीनीव्हा येथील परिषदेच्या वेळीं वाचलेल्या जाहीरनाम्यांतील खालील उता-यावरून या पंथाचीं मतें चांगलीं व्यक्त होतात म्हणून आम्ही त्यांतील एका कलमाचा तर्जुमा देतों. "आमचा राजा हा आमचा शत्रू आहे. आम्ही अराजकपंथी लोक कोणत्याही प्रकारची सत्ता धारण करणारे अगर धारण करूं इच्छिणारे या सर्वांशी विरोध करणार. जो जो जमिनीचा मालक आहे व जो जो आपल्या नफ्याकरितां शेतक-याला काबाडकष्ट करावयास लावतो तो तो जमीनदार आमचा शत्रू होय. जो जो कारखानदार कारखान्याचा मालक असतो व जो जो दासप्राय मजुरांनी आपला कारखाना भरून काढतो तो तोही आमचा शत्रू आहे. सरकार-मग त एकसत्ताकू असाे, अल्पसत्ताक असो, बहुसत्ताक असौ किंवा कामगारसत्ताक असाे-त्यांचे अंमलदार, त्यांचीं निरनिराळीं खातीं, न्यायाधीश व पोलीस या सर्वां मिळून झालेले सरकार-आमचा शत्रू आहे. जिच्या नांवाखाली पाद्यांनीं इतक्या वर्षे चांगल्या लोकांना आपल्या ताब्यांत ठेविलें ती सैतान किंवा ईश्वर या नांवानें मोडली जाणारी तात्विक सत्ताही आमचा शत्रू आहे. गुन्ह्याला पवित्रता देणांरा, "त्याचें समर्थन करणारा, निर्बलांचा छल करणारा व बलिष्टांनी केलेला कायदा हाही आमचा शत्रू आहे. ?"