पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१२]

पहाण्याचा प्रसंग राहूं नये म्हणून लोकसंख्येपुरती अन्नसामग्री देशांतल्यादेशांत उत्पन्न व्हावी, याकरितां शेतीला उत्तेजन देणें. शिवाय देशांत शेतकीची भरभराट असली म्हणजे देशाला प्रसंगीं मोठे सैन्य जमवितां येतें. कारण शेतकरी हा थोड्याशा शिक्षणानें उत्तम शिपाई बनतो असा सर्वत्र अनुभव आहे. तेव्हां देशांतील शेतकरीवर्ग सुसंपन्न असला म्हणजे तें एक देशाचें मोठे गुप्त सामर्थ्यच आहे.
  ४. शेवटीं देशाच्या स्वातंत्र्यास व संरक्षणास खजिन्याची भरपूर तयारी पाहिजे व म्हणून सरकारजवळ व देशांत भरपूर नाणें व सोनेंरुप राहील अशी तजवीज करणें देशांतील सरकारचें कर्तव्यकर्म आहे.
 अर्वाचीन इतिहासकारांच्या मतें उदीमपंथाचे वर निर्दिष्ट केलेले चार हेतू होते. परंतु हें हेतुचतुष्टय सुद्धां दुसऱ्या एका अंतिम हेतूचें साधनचतुष्टयच होय. हा अंतिम हेतु म्हणजे देशाचा दर्जा, वैभव व सामर्थ्य वाढविणें हा होय. व हा अंतिम हेतु सिद्ध करण्याकरितां जरी देशांतील कांहीं व्यक्ती अगर एखादा वर्ग यांचें नुकसान झालें तरी हरकत नाहीं, परंतु या अंतिमहेतूच्या सिध्यर्थ व्यापारउदीम व कलाकौशल्य यांवर दाब ठेवण्याचा सरकारास आधिकार आहे असें त्यांच्या व्यापारी धोरणाचें एक तत्व होतें. इंगलंडमध्ये कॉमवेल व फ्रान्समध्यें कोलवर्ट हे या पंथाचे पुरस्कर्ते व अभिमानी असें समजलें जातें. या दोघांनीं आपापल्या देशांतील कलाकौशल्याला प्रत्यक्ष मदत दिली व परकीय मालावर जबर जकाती बसवून आपल्या देशांतील कारागिरांना परकीय कारागिरांच्या स्पर्धेपासून सोडविलें व या योगानें आपल्या देशाची सांपत्तिक स्थिति व तिच्या द्वारें देशाचें वैभव व सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला. कॉमवेलच्या काळीं व्यापारामध्यें इंग्लंडचा प्रतिस्पर्धी हॉलंड हा देश होता. या देशाचा व्यापार सर्व जगभर होता व जलमार्गावरील तर बहुतेक व्यापार या देशाच्या व्यापा-यांच्या हातांत होता. हॉलंडचें हें व्यापारी व आरमारी वर्चस्व हाणून पाडण्याकरितां इंग्रजी इतिहासज्ञांस पूर्णपणे माहीत असलेले प्रसिद्ध नौकानायानासंबंधी कायदे कॉमवेलने केले.या कायद्यांनी इंग्रज व्यापाऱ्यांना हॉलंडच्या गलाबतांतून मालाची नेआण करण्याची मनाई केली. इंगालांडांतून बाहेर जाणारा माल किंवा आंत येणारा माल इंग्रजांनी बांधलेल्या,इंग्रजांच्या मालकीच्या व इंग्रज नावाड्यांनी चालविलेल्या गलबतांतच आला पाहिजे असा सक्त नियम