पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/225

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१५]

 आतां अशा संपाचा देशाच्या सांपत्तिक स्थितीवर काय परिणाम होतो व देशांतील कारखानदार व मजूर या दोन वर्गांवर काय काय परेिंणाम होती हें पहावयाचें राहिलें. आपली स्थिति सुधारण्याच्या हेतूनें निदान आपल्या मजुरीचे दर कमी न व्हावे अशा बुद्धीनें हे संप होतात हें उघड आहे. मजूरवर्ग आपलें काम सोडून हट्ट धरून बसतो व आपल्या शिलकेवर कांहीं दिवस किंवा कांहीं आठवडे गुजराणा करतो किंवा लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन त्यावर आपला गुजारा करतो. म्हणजे मजुरवर्ग फार मोठा स्वार्थत्याग करतो व मोठ्या कष्टानें दिवस काढतो. व हें सर्व करण्याचा हेतु काय तर कारखानदारांचें नुकसान करून त्यांना आपल्या अटी कबूल करण्यास भाग पाडणें हा होय. आतां समजा, एका मोठ्या धंद्यांतील मजुरांच्या मोठ्या वर्गानें संप केला तर त्याचा परिणाम कारखानदारांच्या गिरण्या बंद पडण्यांत होतो हें उघड आहे. परंतु यांत कारखानदारांचें खरें नुकसान होतें काय ? कारखानदारांचा नफा त्यांच्या कारखान्यापासून होतो खरा; परंतु हा नफा मालाच्या किंमतींतून यावयाचा असतो व प्रचंड कारखान्याच्या पद्धतींत हजारों रुपयांचा माल तयार होऊन नेहमीं पडलेलाच असती. कारखाने बंद झाल्यामुळे नवा माल उत्पन्न होण्याचें बंद होतें. यामुळे मालाचा पुरवठा कमी होतो व शिल्लक मालाला मागणी जास्त झाल्यामुळे त्यांची किंमत वाढते. यामुळे कारखानदारांचा नफा वाढतो. शिवाय कांहीं दिवस कारखान्याला व सर्व यंत्रांना विश्रांति दिल्यासारखे होतें. सारांश, थोड्या दिवसांच्या संपापासून कारखानदारांचें म्हणण्यासारखे नुकसान होत नाहीं. झाला तर फायदाच होतो. मात्र मजुरांच्याकडे पाहिलें म्हणजे त्यांचें फार नुकसान होतें. संपाचे दिवस त्यांना बिनमजुरीशिवाय काढावे लागतात म्हणजे त्यांना आपली पूर्वीचीं असेल नसेल ती शिल्लक खर्च करावी लागते किंवा कर्ज करावे लागतें व अर्धपोर्टी राहून मुलाबाळांची आबाळ करावी लागते. बरे इतकें करून संप सिद्धीस न गेला तर त्यांची जास्तच दैन्यावस्था होते व मग कारखानदार सांगतील त्या अटीवर कामावर जावें लागतें किंवा तो धंदा किंवा गांव सोडून दुस-या धंद्यांत किंवा गांवांत जावें लागतें. बरें, संप सिद्धीस गेला अशी कल्पना केली तरी. एकंदर मजुरांचें झालेलें नुकसान त्यानें भरून येत नाही. समजा, संप चार आठवडे चालला, तर